एक लाख नागरिकांना जिल्हा परिषदेकडून दिलासा
ठाणे : उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद ठाणेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत टंचाईग्रस्त भागांमध्ये प्रभावी नियोजन करून टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ८ जून, २०२६ अखेरच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ४४ गावे व १४५ पाड्यांमधील ९९ हजार ३९७ नागरिकांना ४५ टँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई शहापूर तालुक्यात असून तेथे ३८ गावे व १३५ पाडे टंचाईग्रस्त आहेत. या भागातील ९३ हजार ७३१ नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ४२ खाजगी टँकर कार्यरत आहेत. शहापूर तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागांमध्येही नियमित पाणीपुरवठा पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मुरबाड तालुक्यातील सहा गावे व १० पाड्यांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून तेथील ५,६६६ नागरिकांसाठी ३ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.