मीरा-भाईंदरला मिळणार १२५ एमएलडी पाणी

भाईंदर: शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या संदर्भात, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी अंधेरी येथील एमआयडीसी कार्यालयात एक महत्त्वाची बैठक झाली.

या बैठकीला महापौर डिंपल मेहता, आयुक्त राधाबिनोद शर्मा, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, स्थायी समितीचे अध्यक्ष हसमुख गेहलोत, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नाणेगावकर आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महापौर डिंपल मेहता यांनी सांगितले की, शहराला मंजूर १२५ एमएलडी पाण्याऐवजी केवळ ११५ एमएलडी पाणी मिळत आहे. यामुळे नागरिकांना अंदाजे ४० तासांच्या अंतराने पाणीपुरवठा होत आहे. बैठकीत १० टक्के पाणी कपात मागे घेऊन मंजूर कोट्यानुसार १२५ एमएलडी पाण्याचा नियमित पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांनी आश्वासन दिले की, मान्सूनचा नियमित हंगाम सुरू झाल्यानंतर पाणी कपात संपवण्याचा सकारात्मक निर्णय घेतला जाईल, आणि शहराला त्याचा पूर्ण कोटा पुरवण्यासाठी प्रयत्न केले जातील.