दुर्मीळ पॅगोडा मुंग्यांनी बांधले वारूळ
सुरेश सोंडकर/ठाणे
पर्यावरणाचे संवर्धन आणि जैवविविधतेचे संरक्षण केले तर निसर्ग आपली अनोखी रूपे उलगडून दाखवतो, याची प्रचिती ठाणे पूर्वेतील चेंदणी कोळीवाडा बंदर (विसर्जन घाट) परिसरात आली आहे. येथे एका झाडावर पॅगोडा अँट या दुर्मीळ मुंग्यांच्या जातीचे वारूळ आढळून आले असून, ते निसर्गप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
ठाणे पूर्वेतील चेंदणी कोळीवाडा बंदर परिसराची ओळख केवळ विसर्जन घाट म्हणून मर्यादित राहिलेली नाही. अलीकडील काळात येथे विकसित करण्यात आलेल्या हरित क्षेत्रामुळे आणि वृक्षसंवर्धनामुळे हा परिसर विविध जीवसृष्टीसाठी सुरक्षित अधिवास बनत आहे. सकाळच्या वेळेस पक्ष्यांचा किलबिलाट, विविध फुलपाखरे, सरपटणारे प्राणी तसेच अनेक कीटक प्रजाती येथे सहजपणे पाहायला मिळतात. अशाच जैवविविधतेच्या साखळीत भर घालत एका झाडावर पॅगोडा मुंग्यांचे वारूळ आढळून आले आहे.
पॅगोडा अँट या मुंग्यांची जीवनशैली इतर मुंग्यांपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. बहुतांश मुंग्या जमिनीत, भिंतींच्या फटीत किंवा झाडांच्या पोकळ्यांमध्ये वास्तव्य करतात. मात्र पॅगोडा मुंग्या झाडांच्या फांद्यांवरच आपले मजबूत वारूळ उभारतात. माती, पानांचा चुरा आणि नैसर्गिक स्राव यांच्या साहाय्याने त्या पॅगोडा आकाराची बहुमजली रचना तयार करतात. या वारुळामध्ये अनेक कप्पे असून त्यामध्ये हजारो मुंग्या एकत्रितपणे राहतात. त्यांच्या संघटित जीवनपद्धतीमुळे हे वारूळ निसर्गातील व्यवस्थापन आणि सहजीवनाचे उत्तम उदाहरण मानले जाते.
विशेष म्हणजे या वारुळांची रचना इतकी मजबूत असते की, उन्हाळ्यातील कडक ऊन, पावसाळ्यातील मुसळधार पाऊस किंवा जोरदार वाऱ्याचाही त्यावर विशेष परिणाम होत नाही. झाडांच्या फांद्यांवर उंच ठिकाणी उभारलेली ही वारुळे पाहताना एखाद्या लघु वास्तुकलेचा नमुना असल्याचा भास होतो.
पर्यावरण अभ्यासकांच्या मते, एखाद्या परिसरात अशा दुर्मीळ कीटक प्रजातींची उपस्थिती ही त्या भागातील पर्यावरणीय समतोल चांगला असल्याचे द्योतक असते. कीटक, पक्षी, वनस्पती आणि इतर सूक्ष्मजीव यांच्यातील परस्परसंबंधांमुळे जैवसाखळी अधिक सक्षम बनते. त्यामुळे अशा प्रजातींचे संवर्धन हे पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचे मानले जाते.
शहरीकरणाच्या वाढत्या दबावामुळे अनेक ठिकाणी जैवविविधता कमी होत असताना, चेंदणी कोळीवाडा बंदर परिसरात पॅगोडा मुंग्यांचे वारूळ आढळणे ही आनंददायी बाब मानली जात आहे. विकासकामे आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल साधला तर शहरांमध्येही निसर्गाची समृद्धी टिकून राहू शकते, याचा हा सकारात्मक संदेश आहे. विसर्जन घाट परिसरात दिसलेले हे दुर्मीळ वारूळ सध्या निसर्गप्रेमी, पर्यावरण अभ्यासक आणि नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनले असून, ठाण्याच्या समृद्ध होत चाललेल्या जैवविविधतेचे ते एक सुंदर प्रतीक ठरत आहे.