* आठ वर्षांनंतरही महामार्ग अपूर्णच
* शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्गावरील कामे रखडलेलीच
शहापूर: पावसाळा तोंडावर आला असतांनाही शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्गावरील खुटघर, कोलकवाडी आणि नडगाव परिसरातील रस्त्याची दुरवस्था २०१८ पासून २०२६ साल उजाडूनही कायम असल्याने एमएसआरडीसी प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली असल्याचे वास्तव समोर येत आहे.
दरम्यान एनएच- ५४८ए हा केवळ एक महामार्ग नसून ठाणे व रायगडच्या ग्रामीण विकासाचा कणा आहे. मात्र आठ वर्षांनंतरही अपूर्ण राहिलेला हा प्रकल्प येथील अधिकाऱ्यांचे नियोजन, त्यांचे उत्तरदायित्व आणि अंमलबजावणी यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
शहापूर-पाटगाव आणि पाटगाव-खोपोली या टप्प्यांसाठी सुमारे ४३० कोटींपेक्षा अधिक खर्च मंजूर करण्यात आला होता. यातील अनेक पॅकेजेस नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण होत नसल्याचे केंद्र सरकारनेदेखील मान्य केले होते. २०२० मध्ये लोकसभेत भिवंडीचे तत्कालीन खासदार कपिल पाटील यांनी या प्रकल्पासाठी सुमारे ८५० कोटी मंजूर झाल्याचा उल्लेख करत कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. सुरुवातीला दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी आजही रस्ता अर्धवट अवस्थेत असून काही भागांत वाहतूक धोकादायक परिस्थितीत सुरू आहे. दरम्यान पावसाळ्यात या मार्गावर पडलेल्या भेगा, अपूर्ण कामे आणि पाण्याचा निचरा न होण्याच्या समस्येमुळे अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शालेय विद्यार्थी, कामगार,व्यापारी तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसत आहे. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल प्रशासन आणि संबंधित महामार्ग प्राधिकरणाने तातडीने संयुक्त बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लावावा तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजना पूर्ण कराव्यात, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांचा मोबदला, रखडलेले काम आणि वाढत्या गैरसोयी यामुळे शहापूर-मुरबाड- खोपोली महामार्गावरील हा प्रश्न आता केवळ विकासकामांचा न राहता लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. तथापि पावसाळ्यापूर्वी या महामार्गबाबत ठोस निर्णय होणे अपेक्षित असून याबाबत लवकरच खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांची भेट घेणार असल्याचे प्रवाशांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
जानेवारी २०१८ मध्ये सुरु झालेल्या या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी हजारो झाडे तोडण्यात आल्याचा मुद्दा न्यायालयीन स्तरावरही पोहोचला होता. अधिकृत नोंदींनुसार या प्रकल्पासाठी १० हजारांहून अधिक झाडे तोडण्यास परवानगी देण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र जास्त झाडे तोडली असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यास शहापूर, मुरबाड, कर्जत आणि खोपोली या भागांतील औद्योगिक, कृषी आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा होती. प्रवासाचा वेळ कमी होईल, अपघातांचे प्रमाण घटेल आणि ग्रामीण भागाला बाजारपेठांशी जोडणारा मजबूत दुवा निर्माण होईल असे चित्र रंगविण्यात आले होते. मात्र आठ वर्षांनंतरही नागरिकांना खड्डे, वाहतूक कोंडी, धुळीचे साम्राज्य आणि अपूर्ण कामांचा सामनाच करावा लागत आहे.
शहापूर-मुरबाड-पाटगाव – खोपोली या ५४८ ए महामार्गावरील गोठेघर, बामणे, सापगाव, खुटघर, दोनघर, नडगाव (जा), शेंदुण बु, शेदुण खुर्द, ठिले, दहिवली व कळगाव येथील रस्ता रुंदीकरणात रस्त्याच्या कडेला ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता काम सुरू केले आहे. सदर रस्त्यालगत वरकस व खरीप अशा दोन्ही स्वरूपाच्य जमिनी आहेत. या जमिनीमधून जुन्या रस्त्यासाठी नऊ मीटर जागा संपादन करण्यात आली होती. परंतु आता नवीन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी १७ मीटर जागा भुसंपादीत करण्यात येत आहे- दरम्यान दोन्ही बाजू मिळून ३० मीटर एवढी जागा संपादित करण्यात येत आहे. या संदर्भात शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच माहिती किंवा नोटीस दिली नाही. शिवाय त्या जागेचा मोबदलाही दिला नाही. तसेच या जमिनीचे कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण केले नसून शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन रस्त्याचे काम सुरू केले. दप्तरी असलेली शहापूर-लेनाड-मुरबाड रस्ता नोंद भूसंपादन झालेल्या नऊ मीटरप्रमाणे केली नाही असे बाधित शेतकरी अनंता बसवंत यांनी बोलतांना सांगितले.