ठाणे ४० अंश तर बदलापूर ४१ अंशावर
बदलापूर: मागील काही दिवसांपासून तापमानात झालेली घट आणि अधूनमधून जाणवलेला थंडावा यामुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेपासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा अल्पकाळच ठरला असून, पुन्हा एकदा हवामानात बदल होत तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे.
रविवारी बदलापूर शहराचा पारा थेट ४१ अंशावर पोहोचल्याने उकाड्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. दुपारच्या वेळेत उन्हाचा तडाखा इतका तीव्र होता की रस्ते अक्षरशः ओस पडलेले दिसून आले. नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळले, तर अनेकांनी थंड पेय, पंखे व एसीचा आधार घेत उष्णतेपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला.
ठाणे जिल्ह्यातील इतर शहरांमध्येही तापमानाने उच्चांक गाठला आहे. ठाणे येथे ३९.९°, कळवा ४०.९°, मुंब्रा व दिवा ४१°, डोंबिवली ४१.२°, कल्याण ४१.४°, तळोजा ४१.७° आणि पलावा येथे ४२° इतके तापमान नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरल्याचे चित्र दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गावर याचा सर्वाधिक परिणाम होत असून, आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. दुपारच्या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी व द्रवपदार्थ सेवन करावे, हलके व सैलसर कपडे परिधान करावेत, तसेच डोके झाकूनच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी व्यक्त केली असून, ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेच्या या वाढत्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे.