ठाकरे गटाच्या एकमेव नगरसेवकाचा महासभेत घणाघात
ठाणे: राज्य तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून ठाणे महापालिकेला विविध विकासकामांसाठी गेल्या चार वर्षांत ३९०० कोटी रुपयांचा निधी मिळाला, मात्र आजही शौचालयाला दरवाजा नसल्याने नागरिकांना प्लायवूडचा आडोसा घ्यावा लागत असल्याची बाब ठाणे महापालिकेतील ठाकरे गटाचे एकमेव नगरसेवक शहाजी खुस्पे यांनी उघडकीस आणली. प्रत्येक अर्थसंकल्पात प्राथमिक सुविधांसाठी प्रत्येक नगरसेवकाला भांडावे लागत असल्याचेही त्यांनी महासभेत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
केंद्र आणि राज्य शासनाकडून आलेला निधी तळागाळापर्यंत पोहचला का? या निधीतून कोणती कोणती कामे झाली? खरोखर निधीचा उपयोग ठाणेकरांना झाला का? याचा हिशेब द्या अशी मागणी नगरसेवक शहाजी खुस्पे यांनी आज केली. या प्रकरणी शिवसेनेने महासभेत आवाज उठवत निधीच्या चौकशीसाठी वेगळी यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी ६२२१ कोटींचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत पार पडलेल्या सर्वसाधारण सभेतील अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसवेक शहाजी खुस्पे यांनी प्रभाग क्रमांक १३ मधील विकासकामे तसेच पालिकेच्या उत्पन्न वाढीसह होणाऱ्या खर्चासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. या अर्थसंकल्पीय महासभेत पालिकेला मिळालेल्या
विशेष अनुदानावर खुस्पे यांनी बोट ठेवले. ठाण्याला `स्मार्ट सिटी’च्या माध्यमातूनही सरकारकडून शहरातील विविध प्रकल्पांसाठी निधी दिला गेला. यामधून पायाभूत सुविधा, आरोग्य केंद्र, शिक्षण, गटार पायवाटा, शोचलये आदी सारख्या सुविधांमध्ये बदल होणे अपेक्षित होते. मात्र, ४० वर्ष झाली तरी आपण या मूलभूत प्रश्नासाठी लढतो आहोत याची खंत खुस्पे यांनी महासभेत बोलून दाखवली.
राज्य शासनाकडून शहरासाठी आलेला निधी ठाणेकरांच्या हक्काचा निधी आहे. त्यामुळे या निधीचा सुयोग्य वापर झाला आहे का? नियमानुसार कामे होत आहेत का? राजकारण, पक्ष बाजूला ठेवून दर्जाहीन कामे होत असतील तर त्याला तत्काळ आळा घाला. तसेच प्रत्येक प्रभागात आयुक्तांनी आपली टीम घेऊन दौरा करावा, अशी मागणी शहाजी खुस्पे यांनी यावेळी महासभेत केली.
प्रभाग १३ मध्ये शौचालयांना दरवाजे नसल्यामुळे महिलांना प्लायवुडचा आडोसा घेऊन प्रातर्विधी उरकावा लागतो. वेळेवर पाणीपुरवठा केला जात नसल्याने महिलांना रात्रभर जागे राहावे लागत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून जागोजागी रस्ते, पायवाटा खोदून ठेवल्या असून नाना-नानी पार्क पार्क धूळखात आहे. पावसाला सुरुवात होताच कचरा वाहून गेल्यावर नालेसफाई सुरु होते. त्यामुळे पावसाळ्याआधी नालेसफाई पूर्ण करा, अशी मागणी खुस्पे यांनी केली.