२० टक्के उद्योगांना गॅस तुटवड्याची झळ बसणार
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील २० टक्के लघु व मध्यम उद्योगांमध्ये एलपीजी गॅसचा वापर करण्यात येत असून युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा तीव्र झाल्यास त्याचे गंभीर परिणाम या उद्योग क्षेत्रावर निर्माण होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
आखाती युद्धामुळे जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळीवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. त्याचा परिणाम हॉटेल व्यावसायिकांना बसला असून आता लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उद्योग क्षेत्रात वाढत्या खर्चामुळे उत्पादनावर दबाव येण्याची चिन्हे आहेत. गॅसची टंचाई, कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ, इंधन दरातील चढ-उतार, तसेच वाहतूक आणि लॉजिस्टिक खर्चात झालेली वाढ यामुळे उद्योगांच्या एकूण उत्पादन खर्चात वाढ होत आहे. याशिवाय निर्यात-आयात प्रक्रियेत होणारा विलंबही उद्योगांसाठी अडथळा ठरत आहे.
आव्हानात्मक परिस्थिती असूनही लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्योगांनी यापूर्वीही विविध संकटांवर मात केली आहे. त्यामुळे या संकटातूनही मार्ग काढत देशाच्या आर्थिक प्रगतीत आपला वाटा कायम ठेवण्याचा विश्वास टिसाचे कार्यकारी सचिव एकनाथ सोनावणे यांनी व्यक्त केला.
लघु व मध्यम उद्योग क्षेत्र हे देशाच्या उत्पादन व रोजगार निर्मितीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत उद्योगांना कच्च्या मालाची उपलब्धता, वित्तीय सहाय्य आणि निर्यात प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आवश्यक ती उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत टीस्साचे मानद सचिव भावेश मारू यांनी व्यक्त केले आहे.
ठाणे जिल्ह्यात जवळपास ३० हजार लघु व मध्यम उद्योग कंपन्या आहेत. त्यापैकी ८० टक्के इंजिनिअरिंग कंपन्या आहेत. चार हजाराच्या आसपास कंपन्यांमध्ये प्रोफाईल कटिंग, प्लेट कटिंग करणे आदींसाठी एलपीजीचा वापर करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.