आरटीईच्या एक किमीच्या नियमाला स्थगिती

ठाणे: नागपूर खंडपीठाने आरटीई एक किमी अंतराच्या नियमाला स्थगिती दिल्यामुळे पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु ज्या पालकांनी आधीच अर्ज भरले आहेत, त्यांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्याची संधी मिळेल का? किंवा सुधारित अर्ज समाविष्ट करता येईल का असे प्रश्न पालकांसमोर निर्माण झाले आहेत.

अर्ज भरण्यासाठी १० मार्च ही शेवटची मुदत होती. ही मुदत वाढविण्याबाबत संकेतस्थळावर कोणतिही सुचना देण्यात आलेली नाही, त्यामुळे नव्या नियमावलीला स्थगिती मिळाली असली तरी त्याची अंमलबजावणी कशी होणार याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे.

शिक्षण हक्क कायदा (आरटीई) प्रवेश प्रक्रियेला १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. १० मार्चपर्यंत पालकांना अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, राज्यभरात एक लाखाच्या आसपास आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज दाखल आहेत. तर, ठाणे जिल्ह्यातून १९ हजाराच्या आसपास अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक शहरी भागाती विद्यार्थ्यांच्या अर्जाचा समावेश आहे.

आरटीई कायद्यात यंदाच्या वर्षी तीन किमीऐवजी एक किमी अंतराच्या आतील शाळा निवडाव्यात असा नवीन नियम करण्यात आला होता. या नव्या नियमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आरटीई प्रक्रियेपासून वंचित राहावे लागत होते. तर, शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही शाळा निवडताना अडचन निर्माण होत होती. त्यामुळे या नव्या नियमावलीचा सर्वच स्तरातून विरोध होत होता.

अखेर नागपूर खंडपीठाने आरटीई एक किमी अंतराच्या नियमाला स्थगिती दिल्यामुळे पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु असे असले तरी, या नविन नियमावलीची अंमलबजावणी नेमकी कशी होईल याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. आधी ज्या पालकांनी आरटीईचे अर्ज दाखल केले आहेत त्या अर्जात बदल कसे करात येतील की, नव्या अर्ज भरावे लागतील असा प्रश्न आता पालकांसमोर निर्माण झाला आहे.