कल्याण : हवामान खात्याने रविवारी मुसळधार पावसाचा धोका तसेच त्याचबरोबर भरतीच्या वेळी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याचा रेड अलर्टचा इशारा दिला होता. त्यानुसार रविवारी मध्यरात्रीपासून संततधार पाऊस पडत असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांनी घराबाहेर न पडता रविवारी घरी थांबणेच पसंत केले. रेड अलर्ट दिल्याने अतिवृष्टीमुळे शहरात घडणाऱ्या दुर्घटनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका यंत्रणा २४ तास सज्ज होती.
शनिवारी रात्री पासूनच कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे रात्रीपासूनच स्मार्ट सिटी अंतर्गत लावलेल्या सीसीटीव्हीची पाहणी करत, सखल भागात सक्षन पंप आणि एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आली होती. मात्र दुपारनंतर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याणच्या सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली.
गरज असेल तरच बाहेर पडा’ सुरक्षित राहा, प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन केडीएमसी कडून नागरिकांना केल्याने कल्याण डोंबिवलीकर नागरिकांनी घरा बाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याने रस्त्यावर तुरळक वाहतूक दिसून येत होती. संध्याकाळी कल्याण खाडीचे पाणी वाढल्याने गोविंद लवाडी परिसरातील म्हशीच्या तबेल्यातील म्हशी पाणी शिरल्याने सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्या.