मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बार फुटणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया ३ टप्प्यामध्ये पार पाडण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे नियोजन आहे. सध्या राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये मुंबईसह राज्यातील सर्व महानगर पालिकेचा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. या निवडणुकांबाबत नुकताच सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला खडसावत निवडणुका घेण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंताचा वेळ दिला आहे. ३१ जानेवारीपूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
याआधी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला नोव्हेंबर अखेरपर्यंतचा वेळ दिला होता. पण सरकारने कोर्टात धाव घेत मुदत वाढवण्याची मागणी केली होती. कोर्टाने त्यांची मागणी मान्य करत ३१ जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे. आता राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाकडून निवडणुका कधी आणि कशा घ्यायच्या याचे नियोजन केले जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील.