मुंबई: मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणीसांनी मागील पाच महिन्यांत विनातिकीट, अयोग्य तिकीट किंवा अवैध प्रवास करणाऱ्या १७.१९ लाख प्रवाशांना ताब्यात घेऊन १००.५० कोटींचा दंड वसूल केला.
ऑगस्ट महिन्यात, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी टीमने २.७६ लाख प्रवाशांना विनातिकीट/वैध तिकीटाशिवाय प्रवास करताना ताब्यात घेतले, जे ऑगस्ट २०२४ मधील २.३४ लाख प्रवाशांशी तुलना करता १८टक्के वाढ दर्शवते.
ऑगस्ट २०२५ मध्ये विनातिकीट/वैध तिकीटाशिवाय प्रवास करणाऱ्यांकडून १३.७८ कोटी दंड वसूल केला गेला, तर ऑगस्ट २०२४मध्ये या दंडाची रक्कम ८.८५ कोटी होती, यामुळे ५५टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून येते.
आर्थिक वर्ष २०२५-२६ (एप्रिल ते ऑगस्ट-२०२५) या कालावधीत भुसावळ विभागात ४.३४ लाख प्रकरणांमधून ३६.९३ कोटी रुपये, मुंबई विभागात ७.०३ लाख प्रकरणांमधून २९.१७ कोटी रुपये, नागपूर विभागात १.८५ लाख प्रकरणांमधून ११.४४ कोटी रुपये, पुणे विभागात १.८९ लाख प्रकरणांमधून १०.४१ कोटी रुपये, सोलापूर विभागात १.०४ लाख प्रकरणांमधून ५.०१ कोटी रुपये आणि मुख्यालयात १.०४ लाख प्रकरणांमधून ७.५४ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.
तिकीट फसवणूक रोखण्यासाठी आणि महसूलाची हानी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत युटीएस मोबाइल ॲपद्वारे स्थिर क्युआर कोडने तिकीट बुकिंग थांबवली आहे, कारण प्रवाशांकडून त्याचा व्यापक गैरवापर झाल्याचे अहवाल प्राप्त झाले होते. क्युआर कोड प्रणाली बंद केल्यामुळे पेपरलेस तिकीटिंगच्या गैरवापरावर आता नियंत्रण आले आहे.