अलिबाग: मुंबई-गोवा महामार्गावर मौजे रातवड गावच्या हद्दीत एसटी बसला अपघात होऊन पलटी झाल्याने सात जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, २९ जुलै रोजी श्रीवर्धन-भिवंडी बस माणगावहून मुंबई बाजूकडे जात असताना सायंकाळी ५च्या दरम्यान मौजे रातवड गावच्या हद्दीत आल्यावेळी चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने बस महामार्गाच्या खाली जाऊन शेतात पलटी झाली. बसमध्ये एकूण २४ प्रवासी प्रवास करीत होते. या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातात निकिता पवार (३०), जितेंद्र पवार (३५), जिनल पवार (९), महेश जाधव (२४), रोहित पांडे (३०), माया जाधव (५५) आणि बसचालक असे एकूण सात जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल करण्यात आले असून घटनेचा पुढील तपास माणगाव पोलिस करीत आहेत.