माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर यांची मागणी
बदलापूर : बदलापूर शहराची लोकसंख्या वाढती लोकसंख्या आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षात घेता बदलापूर रेल्वे स्टेशन टर्मिनल म्हणून जाहीर करून मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या मेल एक्स्प्रेसला बदलापुरात थांबा द्यावा, अशी मागणी प्रवाश्यांकडून होत असल्याचे सांगून माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर यांनी केली आहे.
बदलापूर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या आणि लोकल सेवेवर पडणारा प्रवाशांचा ताण, प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता बदलापूर रेल्वे स्टेशन टर्मिनल करावे अशी मागणी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे करण्यात आल्याचे श्री. पातकर म्हणाले.
बदलापूर रेल्वे स्थानकातून पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या सिंहगड, इंटरसिटी, तसेच डेक्कन एक्स्प्रेसना बदलापूर स्थानकात येता-जाताना थांबा द्यावा, त्यादृष्टीने प्लॅटफॉर्मची लांबी वाढवावी, बदलापूर आणि अंबरनाथ परिसरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच नोकरी व्यवसायानिमित्त पुणे येथे जातात त्यांना रेल्वे प्रवासाची योग्य सोय नसल्याने खाजगी वाहनांमधून प्रवास करावा लागतो, मेल एक्स्प्रेस बदलापूरला थांबा दिल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल आणि रेल्वेचे उत्पन्न वाढेल, शिवाय मुंबई-बडोदरा एक्स्प्रेस वे बदलापूर शहरातून जात असल्याने त्याला कनेक्टिव्हिटी असणे गरजेचे आहे, असा विश्वास श्री.पातकर यांनी रेल्वेच्या विभागीय व्यस्थापकांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.