उद्धव ठाकरे यांचा घणाघात
मुंबई: “मराठी माणूस एकत्र येऊ नयेत, यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना पक्षप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकू, असे जर कुणाला वाटत असेल तर त्यांचे नामोनिशाण आम्ही पुसून टाकू, असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा ५९ वा वर्धापनदिन सोहळा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्ष फोडाफोडी आणि नेत्यांच्या पळवा-पळवीच्या राजकारणावरून भाजपा आणि एकनाथ शिंदे गटावर टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे नेते राज ठाकरे यांच्याशी संभाव्य युतीबाबत चाललेल्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केले. तसेच अभिनेते नाना पाटेकर यांच्या प्रहार चित्रपटातील एका संवादाचा आधार घेत त्यांनी एकनाथ शिंदे गटाला थेट आव्हान दिले.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासाठी म्हणाले, “मराठी माणूस एकत्र येऊ नयेत, यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना पक्षप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकू, असे जर कुणाला वाटत असेल तर त्यांचे नामोनिशाण आम्ही पुसून टाकू. भाजपाचे नामोनिशाण आम्ही महाराष्ट्रातून पुसून टाकू. आज मी तयारीनिशी उभा आहे, असे स्पष्ट करत श्री.ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तुमची कितपत तयारी आहे? असा प्रश्नही केला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “नाना पाटेकर एका चित्रपटात गुंडासमोर उभे राहून म्हणतात, ‘कम ऑन किल मी’. त्याप्रमाणेच मीही गद्दारांसमोर उभा राहून म्हणतो, ‘कम ऑन किल मी’. असेल हिंमत तर या अंगावर. पण अंगावर येणार असाल तर येताना रुग्णवाहिका घेऊन या. कारण येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल.
राज ठाकरेंशी संभाव्य युतीबाबतही उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले. ते म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून बातम्या सुरू आहेत. काय होणार? होणार का? मी म्हणतो होणार की नाही होणार, ते लवकरच सर्वांना कळेल. तुमच्या (कार्यकर्ते) सर्वांच्या जे मनात आहे, राज्याच्या मनात जे आहे, तेच मी करेन.”