ठाणे: बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात ठाणे वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे आणि अन्य नियमांचा भंग केल्याबद्दल १६ दिवसांत ७२५२ रिक्षाचालकांना तब्बल एक कोटी १४ लाख ६७ हजारांचा दंड ठोठावला आहे.
बॅच नाही, योग्य गणवेश नाही, जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट वागणे, वाहतुकीचे नियम न पाळणे अशा विविध तक्रारी ठाणे वाहतूक विभाग हद्दीतील रिक्षाचालकांविरुद्ध होत असतात. त्यानुसार ठाणे वाहतूक विभागाने शहरातील बेशिस्त व मुजोर रिक्षा चालकांना वठणीवर आणण्यासाठी विशेष मोहिम सुरू केली आहे. सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत रिक्षा चालकांची झाडाझडती घेण्यात येत आहे. यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने अशा रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
१ जून ते १६ जून दरम्यान रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नऊ लाख ३९ हजार रुपये दंडाची वसुली केली आहे तर १० कोटी ११ लाखांची वसुली बाकी असल्याची माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.