कल्याण पश्चिमेत भटक्या कुत्र्यांचा पाच जणांना चावा

कल्याण : कल्याणात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सोसायटीत पाच जण भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

कल्याण पश्चिमेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर असलेल्या सनराईज गॅलेक्सी सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. या सोसायटीत गेल्या काही दिवसांपासून अचानकपणे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. गेल्या आठवड्याभरात या भटक्या कुत्र्यांनी पाच जणांना चावा घेतला असून त्यापैकी तीनजण हे शालेय विद्यार्थी असून काही प्रौढ व्यक्ती असल्याची माहिती सोसायटीत राहणाऱ्या निलेश रुद्राक्ष यांनी दिली.

सोसायटीत येणाऱ्या-जाणाऱ्या स्थानिक रहिवाशांवर अचानकपणे हे सर्व भटके कुत्रे हल्ला चढवत असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी अक्षरशः जीव मुठीत धरून सध्या वावरत असल्याचे चित्र आहे.

या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अजय गायकवाड, अर्णव गायकवाड, झेबा खान, दक्ष वर्मा हे जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकारानंतर सोसायटी पदाधिकाऱ्यांनी कडोंमपा आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना पत्र लिहून तातडीने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.