रिक्षाचालकांचे ‘उखळ’ पांढरे
ठाणे : पूर्व भागात वाहतुकीचे ‘तीन तेरा’ वाजले असताना, 12 बंगला भागातही सॅटीसची कामे सुरु झाली आहेत. परिणामी ठिकठिकाणच्या लोकल प्रवाशांना पूर्व स्टेशनपासून कोपरी पुलापर्यंत सकाळी आणि सायंकाळी पायपीट करावी लागत आहे. बहुतेक रिक्षाचालक यामुळे दररोज किमान 800 ते 1000 रुपयांचा व्यवसाय करत असल्याची माहिती एका चालकाने दिली.
ही कामे सुरु होऊन आठवडा झाल्यानंतर दररोज ये-जा चालणे त्रासदायक झाल्यामुळे असंख्य चाकरमान्यांनी रिक्षेने ये-जा करणे पसंत केले. ठाणे वाहतूक पोलिसांनीही या असंख्य चाकरमान्यांची फरफट पाहिल्यानंतर तीनजणांसाठी रिक्षा उपलब्ध करुन दिल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. येता-जाता प्रत्येकी 10-10 रुपये देऊन ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करत आहेत.
वाहतूक पोलिसांनी ही सुविधा उपलब्ध केल्यानंतर दररोज किमान 60 ते 100 रिक्षाचालक प्रत्येक प्रवाशाकडून 10-10 रुपये घेतात, ही माहिती कोपरीतील आणि नौपाड्यातील रिक्षाचालकांनी घेत पूर्वेकडे हँडल फिरवले. 12 बंगलाच्या भागातील बस स्टँडजवळ रिक्षाचालक थांबलेले असतात. इतरवेळी प्रवाशांना हाका माराव्या लागतात, मात्र येथे प्रकार उलट झाला असून प्रवाशांकडे चालक येतात, असे चित्र पाहण्यास मिळाले.
वाहतूक पोलिसांनी तीनच प्रवासी घेण्याचे निक्षून सांगितले असले तरी पोलीस उपस्थित नसताना चालकाजवळ प्रवासी बसतात. येथील सर्वाधिक रिक्षाचालक कोपरी गावातील आणि आनंदनगरनिवासी असल्यामुळे त्यांनाही लांबवर जाण्याची गरज वाटत नाही, असे कोपरी आणि आनंदनगरातील रिक्षाचालकाने सांगितले. रिक्षा दिवसभर चालवून आठ तास दूरदूर जावे लागत असल्याचा शारीरिक त्रास होत नाही, असे स्थानिक चालकाने सांगितले.