डोंबिवलीतील वादावर रविंद्र चव्हाण यांचे श्रीकांत शिंदे यांना प्रत्युत्तर
कल्याण: कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात कलगीतुरा सुरूच असून श्रीकांत शिंदे यांच्या राजीनामा देण्याच्या गोष्टीवरून रविंद्र चव्हाणांनी आता प्रत्युत्तर दिले आहे.
डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्यानतंर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या राजीनामा देण्याच्या गोष्टीची एक प्रकारे हवा काढल्याची चर्चा आहे.
श्रीकांत शिंदे यांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, भाजपच्या एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर त्याच्या मागे उभं राहणं हे आमचे कर्तव्य आहे. तेच मी करतोय. या प्रकरणाला एवढं ताणायची गरज नाही. हे फार छोटे प्रकरण आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या काही कार्यकर्त्यांवर सातत्याने आरोप केला जात आहे. त्यावर कार्यकर्त्यांचं मत मी वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्याचं काम करणार आहे.
रविंद्र चव्हाण यांनी श्रीकांत शिंदे यांना अप्रत्यक्षपणे ते भाजपमुळेच निवडून आले आहेत याचीही आठवण करून देत आपल्या विरोधात व्हाट्सएपच्या माध्यमातून मेसेजेस पसरवणाऱ्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, 2014 आणि 2019 साली श्रीकांत शिंदे यांच्या विजयामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आता खासदारांपर्यंत असलेले कार्यकर्ते हे नवीन आहेत, ते त्यावेळी कुठे होते? आता ते आपल्या विरोधात व्हॉट्सअॅपवर मेसेज पसरवत आहेत. कल्याण लोकसभेचा उमेदवार हा एनडीएचा उमेदवार असेल आणि त्याला मोठ्या मतांनी आम्ही निवडून आणणार आहोत.
काय आहे प्रकरण?
डोंबिवलीत एका भाजप पदाधिकाऱ्यावर त्यांच्याच पक्षाच्या महिला कार्यकर्तीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामागे शिवसेनेतील शिंदे गटाचा हात असल्याचा आरोप करत भाजपने डोंबिवलीत मोर्चा काढला. तसेच यापुढे शिंदे गटाला सहकार्य करणार नसल्याचा ठराव स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यावरुन आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नेमक्या याच कारणामुळे संतापलेल्या श्रीकांत शिंदेंनी थेट आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. शिवसेना-भाजपच्या युतीत क्षुल्लक कारणांसाठी मिठाचा खडा टाकण्याचं स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, “2024 साली नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा आमचा आणि देशातील तमाम जनतेचा निर्धार आहे . त्यासाठी आम्ही प्राणपणाने प्रयत्न करू. परंतु, काही क्षुल्लक कारणांसाठी शिवसेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू आहे. मला व्यक्तीशः कोणत्याही पदाची लालसा नाही. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय शिवसेना-भाजप युतीचे वरिष्ठ नेते घेतील. मला उमेदवारी दिली नाही तरी जो कुणी उमेदवार असेल त्याचा एकदिलाने आम्ही प्रचार करू आणि त्याला विजयी करू.