यंदा डाळींचे उत्पादन घटल्याने दरात वाढ
नवी मुंबई : यंदा गुजरात आणि महाराष्ट्रामधील डाळींच्या उत्पादनाला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे, त्यामुळे वाशीतील एपीएमसीत दाखल होणाऱ्या डाळींची आवक घटली आहे. आवक कमी असल्याने बाजारात डाळींचे दर वधारले असून तूरडाळ, उडीद डाळींनी शंभरी पार तर मुगडाळीच्या दरातही तीन टक्क्याने वाढ झाली आहे.
एपीएमसी बाजारात महाराष्ट्रभरातून आणि गुजरात येथून मोठ्या प्रमाणात डाळीची आवक होते. मध्य प्रदेशातूनही तुरळक डाळ दाखल होते. मात्र यंदा पावसामुळे डाळीच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. फेब्रुवारीपासून डाळींची दरवाढ होण्यास सुरुवात झाली असून आता पुन्हा डाळींचे दर वधारले आहेत.
मंगळवारपर्यंत तूरडाळ ४०८५ क्विंटल, उडीद डाळ १४१४ क्विंटल आणि मुगडाळ १३०० क्विंटल बाजारात आवक झाली आहे. मे महिन्यात घाऊक बाजारात तूरडाळ प्रतीकिलो १०० रुपयांनी उपलब्ध होती त्यामध्ये १५ टक्के दरवाढ झाली असून ११५ रुपयांवर गेली आहे. उडीद डाळ ९५ रुपयांवरून सहा टक्के दरात वाढ झाली असून १०१ रुपयांनी विक्री होत आहे. तर मुगडाळ ९५ रुपयांवरुन ९८ रुपयांना विक्री होत आहे. येत्या पावसाळ्यात डाळींचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून एपीएमसी धान्य बाजारात कडधान्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. यंदा अवकाळी पावसाचा फटका डाळींच्या उत्पादनाला बसल्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे. त्यामुळे डाळींच्या दरातही दरवाढ होत आहे. त्यामुळे यंदा डाळींचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे, असे एपीएमसीतील धान्य व्यापारी आणि संचालक नीलेश वीरा यांनी सांगितले.
फेब्रुवारी ते जूनपर्यंत डाळींच्या किमतीत वाढ (रुपयांमध्ये)
डाळ फेब्रु. मे जून
तूरडाळ ९० १०० ११५
उडीद डाळ ९२ ९५ १०१
मुगडाळ ९४ ९५ ९८