सुट्टीचे नियोजन सोशल मीडियावर न टाकण्याचे पोलिसांचे आवाहन
नवी मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या असून लोक आपापल्या गावी जाऊ लागले आहेत. सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अनेकांचे प्लानिंग सुरू आहे. मात्र आजच्या मोबाईल क्रांतीत आपल्या घडामोडी सोशल मीडियावर टाकण्याची स्पर्धा लागली आहे. याच सोशल मीडियावर चोर नजर ठेऊन असतात आणि बंद घरांना चोरट्यांकडून ‘लक्ष्य’ केले जाते. त्यामुळे आपल्या सुट्टीचे नियोजन सोशल मीडियावर प्रसारीत न करण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी शहरवासियांना केले आहे.
शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या की बऱ्याच जणांना गावी किंवा बाहेर फिरायला जाण्याचे वेध लागतात. त्याचे नियोजन किंवा फोटो सोशल मीडियावर प्रसारीत करतात. याच सोशल मीडियावर घरफोडी करणारे गुन्हेगार लक्ष ठेऊन असतात. अशा मोकळ्या घरांवर हात साफ करतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवसात बाहेर फिरायला गेल्यावर किंवा नियोजन सोशल मीडियावर प्रसारीत न करण्याचे तसेच बाहेर फिरायला गेल्यावर त्याची कल्पना आपल्या शेजाऱ्यांना देऊन जावे, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी शहर वासियांना केले आहे.