मोरबे धरणात ४८ टक्के पाणीसाठा

१६ ऑगस्टपर्यंत पाणी पुरणार

नवी मुंबई: शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मोरबे धरणातील जलसाठ्यात यंदा मागील वर्षाच्या तुलनेत घट झाल्याचे समोर आले आहे. सध्या धरणात केवळ ४८.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, हा साठा १६ ऑगस्टपर्यंत पुरेल, असा अंदाज महापालिका प्रशासनाचे कार्यकारी अभियंता संतोष उनवणे यांनी सांगितले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या तोंडावर धरणातील पाणीसाठा घटत असला, तरी मागील वर्षाच्या तुलनेत ही घट अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत धरणातील साठा ५१ टक्के होता, त्यामुळे यंदाची परिस्थिती प्रशासनासाठी चिंतेची ठरत आहे. वाढते तापमान, अपुरा पाऊस आणि वाढती लोकसंख्या यामुळे पाण्याच्या मागणीत वाढ झाली असून उपलब्ध साठ्यावर ताण निर्माण झाला आहे. त्यात पनवेल परिसरात पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप होत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याचा ४८.०५ टक्के साठा योग्य नियोजन आणि काटकसरीने वापरल्यास ऑगस्टपर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवता येऊ शकतो. मात्र, पावसाळा उशिरा सुरू झाल्यास किंवा अपेक्षित पर्जन्य न झाल्यास पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून पाणी व्यवस्थापनावर विशेष भर दिला जात आहे. शहरातील पाणीगळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन अधिक शाश्वत पद्धतीने करणे अत्यावश्यक बनले आहे. पर्यायी जलस्रोतांचा शोध, जलसाठा वाढविण्याच्या योजना आणि पुनर्वापराच्या प्रकल्पांची अंमलबजावणी केल्यास भविष्यातील पाणीटंचाई टाळता येऊ शकते. एकूणच, मोरबे धरणातील घटता जलसाठा हा नवी मुंबईसाठी इशारा मानला जात असून, प्रशासनासोबतच नागरिकांनीही पाणी बचतीसाठी सक्रिय भूमिका घेणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित होत आहे.

एकीकडे पनवेल तालुक्यातील देवद आणि विंचुबे ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या मोरबे जलवाहिनीतून दररोज एक लाख युनिट पाणी अनधिकृतपणे उपसले जात असल्याचा आरोप नगरसेवक गवस यांच्याकडून करण्यात आला आहे. या ठिकाणी केवळ १८०० युनिटपर्यंत पाणी वापरण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीला अनधिकृत भगदाड पाडून दररोज एक लाख युनिटपर्यंत पाणी चोरले जात आहे. या प्रचंड पाणीचोरीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खान्देश्वर पोलिसांना पत्र देखील दिले आहे.

यंदा मान्सून सरासरीच्या केवळ ९४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यात एल निनोमुळे मान्सूनचे वारे कमकुवत होऊन पावसावर थेट परिणाम होणार आहे. परिणामी जून महिना तुलनेने स्थिर राहील, पण जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांत पाऊस कमी पडण्याची शक्यता स्कायमेट या संस्थेने वर्तवली आहे.