दिव्यातील २७५ कुटुंबे रस्त्यावर, भूमाफिया मात्र मोकाट

ठाणे: उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिव्यातील सात बेकायदा इमारती पालिका प्रशासनाने रिकाम्या केल्या आहेत. जवळपास २७५ कुटुंबे आणि १६०० रहिवासी रस्त्यावर आले आहेत. या बेकायदा इमारतींवर पालिकेच्या अतिक्रमण पथकाने आजपासून हातोडा चालवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, एकीकडे शेकडो कुटुंबांचे संसार उघड्यावर पडला असताना मात्र भूमाफिया, बिल्डर मोकाट कसे? असा सवाल उपस्थित झाला आहे.

दिवाळीच्या सुट्टीनंतर ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा अनधिकृत इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला असून सोमवारी दोन इमारती, मंगळवारी चार तर बुधवारी एक इमारत पूर्ण रिकामी करून त्यावर पालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे.

सोमवारी रहिवाशांच्या विरोधानंतर तोडक कारवाईत पुन्हा अडथळा येऊ नये यासाठी मंगळवारी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या सातही इमारतींमध्ये २७५ कुटुंबे वास्तव्यास होते. लाखो रुपये खर्च करून फ्लॅट विकत घेणाऱ्या या नागरिकांवर मात्र बेघर होण्याची वेळ आली आहे.