जिल्हा
लाच घेताना दोन एपीएमसी अधिकारी जेरबंद
लाच घेताना दोन एपीएमसी अधिकारी जेरबंद
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनात भ्रष्टाचारविरोधी विभागाने मोठी कारवाई करत स्वच्छता विभागातील दोन अधिकाऱ्यांना एक लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे एपीएमसी प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता उप सचिव डॉ. दीपक आवटी आणि स्वच्छता प्रभारी निरीक्षक समीर म्हात्रे यांनी एका स्वच्छता कंत्राटदाराकडून प्रलंबित बिल मंजुरीसाठी १५ टक्के कमिशनची मागणी केली होती. संबंधित कंत्राटदाराने याबाबत भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या नवी मुंबई युनिटने पोलिस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. त्यानुसार एपीएमसी प्रशासकीय इमारतीतील स्वच्छता उप सचिव कार्यालयात लाचेची रक्कम स्वीकारण्याचा व्यवहार सुरू असताना एसीबी पथकाने धाड टाकली. या कारवाईदरम्यान १ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपी अधिकाऱ्यांना तात्काळ ताब्यात घेतले.
या घटनेनंतर एपीएमसी प्रशासनात एकच खळबळ उडाली असून अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, एपीएमसी मधील कंत्राटी कामे, बिल मंजुरी प्रक्रिया आणि विविध विभागांतील आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
300x450
300x600