जिल्हा
मुल्लाबाग भागात दोन महिन्यांसाठी वाहतूक बदल
मुल्लाबाग भागात दोन महिन्यांसाठी वाहतूक बदल
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: राज्य सरकारचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाच्या निर्माण कामासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी दोन महिन्यांसाठी मुल्लाबाग भागात वाहतूक बदल लागू केले आहेत. हे वाहतूक बदल ५ ऑक्टोबरपर्यंत कायम असतील.
ठाणे-बोरिवली भुयारी मार्गिका प्रकल्प निर्माणाचे काम मागील अनेक महिन्यांपासून मानपाडा जवळील मुल्लाबाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगराखाली होत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हा प्रकल्प निर्माण केला जात आहे. मुल्लाबाग भागातील डोंगराखालून हा मार्ग भुयारी केला जाणार आहे. त्यामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर अवघ्या १५ मिनीटांत पार करता येऊ शकते असा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे.
या निर्माणकामासाठी मुल्लाबाग येथील हिलक्रिस्ट गृहसंकुलाजवळून नीळकंठ ग्रीन गृहसंकुलाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी रस्ता बंद करावा लागणार आहे. त्यामुळे येथील वाहतूक विरुद्ध दिशेकडून मार्गस्थ केली जाणार असून त्याचा परिणाम येथील वाहतूकीवर बसू शकतो.
हिलक्रिस्ट गृहसंकुल येथून नीळकंठ ग्रीन गृहसंकुलाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना सत्या शंकर गृहसंकुलाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने नीळकंठ वुड्स गृहसंकुलापासून सत्या शंकर गृहसंकुल आणि मुल्लाबागच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गावर विरुद्ध दिशेने वाहतूक करतील. हे वाहतूक बदल ६ ऑगस्टपासून लागू झाले असून ५ आक्टोबरपर्यंत कायम राहणार आहेत.
300x450
300x600