जिल्हा
उद्यान विभागातील कामगारांच्या वेतनाचा तिढा कायम
उद्यान विभागातील कामगारांच्या वेतनाचा तिढा कायम
फोटो: ठाणे वैभव
कामगारांचे उपोषण तिसऱ्या दिवशी सुरूच
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागातील कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याने हे कामगार १ ऑक्टोबरपासून उपोषणाला बसले आहेत. यावर कुठलाच तोडगा निघाला नसल्याने तिसऱ्या दिवशीही कामगारांचे उपोषण कायम आहे.
ठेकदार आणि उद्यान विभागातील अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने साधारण ४० कामगारांना किमान वेतन दिले जात नव्हते. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात होते. महापालिकेच्या धोरणाप्रमाणे २२०० चौरस मीटरसाठी एक कामगार याप्रमाणे १७००६०३ क्षेत्रफळासाठी ७७३ कामगार कार्यरत असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र उद्यान विभागात साडेचारशे कामगार कार्यरत आहेत. उर्वरित २०० कामगारांचे वेतनाचे पैसे अधिकारी आणि ठेकेदार दरमहा वाटून घेत आहेत. त्यातच जे कामगार कामाला आहेत त्यांनाही किमान वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
महानगरपालिका एका कामगारासाठी २७ हजार रुपये खर्च करत असेल आणि कामगाराला फक्त १२ हजार रुपये मिळत असतील तर उरलेले १५ हजार रुपये कोणाच्या खिशात जातात? असा सवाल करत कामगारांच्या वेतनातील हा फरक दूर करून कामगारांना किमान वेतन अदा करावे, अशी मागणी समाज समता कामगार संघटनेचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी केली आहे. जोवर वेतन अदा करण्याबाबत लेखी आश्वासन दिले जात नाही तोवर उपोषण कायम राहिल, असे देखील लाड यांनी स्पष्ट केले आहे.
300x450
300x600