जिल्हा

दोन दिवसांत रस्ता दुरुस्त करा, अन्यथा खड्ड्यातच भात लावणी

दोन दिवसांत रस्ता दुरुस्त करा, अन्यथा खड्ड्यातच भात लावणी
दोन दिवसांत रस्ता दुरुस्त करा, अन्यथा खड्ड्यातच भात लावणी फोटो: ठाणे वैभव
प्रहार संघटनेचा एमएसआरडीसी प्रशासनाला इशारा शहापूर: शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्गावरील खुटघर परिसरातील धोकादायक खड्डे आणि अपूर्ण रस्त्याच्या कामाची दखल घेत दोन दिवसांत रस्ता वाहतुकीस योग्य करून द्यावा; अन्यथा याच रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये भाताची लावणी करून प्रशासनाचा निषेध करण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे. प्रहारचे तालुकाध्यक्ष वसंत पानसरे यांनी ही माहिती दिली. शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्गाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली. मात्र आठ वर्षांचा कालावधी उलटूनही खुटघर, नडगाव तसेच मुरबाड तालुक्यातील वज्राचीवाडी परिसरातील रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. खुटघर परिसरात रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरील धोका अधिक वाढत असल्याने अनेक नागरिकांनी मुख्य मार्ग टाळून पर्यायी मार्गाचा वापर सुरू केला आहे.रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना सुमारे चार किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत असून, त्याचा थेट परिणाम प्रवासाचा वेळ, इंधन आणि वाहनांच्या देखभाल खर्चावर होत आहे. त्यामुळे आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या महामार्गाच्या कामाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्त्याच्या समस्येबाबत नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय प्रहार संघटनेने घेतला आहे. यावेळी प्रहार सल्लागार घनश्याम परदेशीं, सचिव विनायक बोन्द्रे, उपाध्यक्ष धनंजय वरकुटे, संघटक विजय हरणे, सह सचिव निलेश बोटकोंडले, किन्हवली शहर अध्यक्ष विश्वास सातपुते,युवा संघटक मयूर किरपण आदि प्रहार पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600