जिल्हा
ठाणे जिल्ह्यात भात पेरणीला वेग
ठाणे जिल्ह्यात भात पेरणीला वेग
फोटो: ठाणे वैभव
३३५८ हेक्टरवर पेरणी पूर्ण
ठाणे: गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यात भात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. सध्या जिल्ह्यात ३,३५८.५७ हेक्टर क्षेत्रावर भाताची थेट पेरणी, तर ४,४६० हेक्टर क्षेत्रावर भात व नागलीची रोपवाटिका तयार करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात भातपीक घेतले जाते. पावसाने दडी मारल्याने जूनअखेर पूर्ण होणाऱ्या पेरण्या यंदा जुलैमध्येही सुरूच आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांतील समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिला असून उर्वरित क्षेत्रावरील पेरणीही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस सुरू झाल्याने भात आणि नागलीच्या रोपवाटिका मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आल्या. सध्या भात पिकाची रोपे रोपवाटिकेच्या अवस्थेत असून रोपलागवडीच्या कामांनाही गती मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या जिल्ह्यात कोणत्याही प्रमुख किडी अथवा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला नसल्याचेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अतिवृष्टीमुळे कल्याण, अंबरनाथ, भिवंडी आणि शहापूर तालुक्यांतील २,३४० शेतकऱ्यांचे सुमारे ७८.५७ हेक्टर क्षेत्रावरील भात रोपवाटिकेचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे रोपवाटिकेची उगवण विरळ झाली आहे. तसेच भिवंडी तालुक्यातील ८८ आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या १६.४५ हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे फांद्या मोडणे आणि झाडे उन्मळून पडणे अशा प्रकारचे नुकसान झाले आहे. परिस्थितीचे पंचनामे सुरू असून शासनाच्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
300x450
300x600