जिल्हा
शहापूर आगाराला नवीन एस. टी. गाड्यांची कमतरता
शहापूर आगाराला नवीन एस. टी. गाड्यांची कमतरता
फोटो: ठाणे वैभव
प्रवासी आणि कर्मचारी यांचे वाद विकोपाला
शहापूर: शहापूर आगारातील बस गाड्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून अनेक बस गळक्या व नादुरुस्त अवस्थेत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहापूर आगाराला नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश दुधाळे यांनी खासदार सुरेश म्हात्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहापूर तालुक्यातील डोळखांब, वाशाळा, किन्हवली, खराडे, टहारपूर, कसारा, विहीगाव, मढ, ढाढरे, चोंढे, टाकीपठार, मुरबाड, टेंभरे, नेहरोली, आसनगाव, सरलांबे, केळीचापाडा, सरळगाव, काजळविहीरी, वाडा, मेंगाळपाडा तसेच डहाणू आदी दुर्गम भागात जाणाऱ्या बस वेळेवर धावत नसल्याने विद्यार्थी, कामगार, महिला व सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. कोरोनापूर्वी शहापूर आगारातून ज्या प्रमाणात बसफेऱ्या सुरू होत्या, त्या आता मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. पूर्वी सुमारे 60 बस असलेल्या आगारात सध्या केवळ 45 बस उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. परिणामी दोन बसमधील प्रवाशांना एका बसमध्ये प्रवास करावा लागत असून प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान गाड्यांची संख्या कमी असतांना कर्मचारी काहीच पर्याय काढू शकत नाही, हे समजून न घेता काही प्रवासी हमरीतुमरीवर येतात. तसेच अनेक बस थांब्यांवर गाडीत जागा नसल्याने बस न थांबल्याने प्रवासी व एस.टी. कर्मचारी यांच्यात विकोपाचे वाद होतांना दिसत असून ग्रामीण भागातील नागरिकांना याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये दोन्ही घटकांचा दोष नसतो. मात्र या सगळ्या घटनेची प्रशासन हाताची घडी घालून मजा पाहताना दिसत आहे.
खासगी वाहतूक सेवा बंद असल्याने नागरिक पूर्णपणे एसटी बस सेवेवर अवलंबून आहेत. त्यामुळे शहापूर आगाराला तातडीने नवीन बस उपलब्ध करून जुन्या वेळापत्रकानुसार बससेवा सुरू करावी, अशी मागणी रमेश दुधाळे यांनी केली आहे. नवीन बस उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील प्रवासी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
300x450
300x600