जिल्हा
ठाण्यात ५० नगरसेवक हवेत; भाजपचे प्रभारी नाईकांना टार्गेट
ठाण्यात ५० नगरसेवक हवेत; भाजपचे प्रभारी नाईकांना टार्गेट
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महापालिकेत भाजपचे किमान ५० नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले असून त्याचाच एक भाग म्हणून गणेश नाईक यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील निवडणुकीत ज्या प्रभागांत भाजपा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता, अशा प्रभागांत विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना श्री.नाईक यांना देण्यात आल्या आहेत.
ठाणे महापालिकेत भाजपचे २३ नगरसेवक आहेत. ही संख्या ५०च्या पुढे घेऊन जाणे आवश्यक असल्याने श्री.नाईक हे मागील पाच ते सहा महिन्यांपासून ठाण्यात भाजपाचा महापौर होणार असे वक्तव्य करत आहेत. ठाण्यात भाजपाची ताकद वाढविण्यासाठी तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी त्यांनी जनता दरबाराचे आयोजन पुन्हा सुरु केले. या जनता दरबाराच्या माध्यमातून ते ठाणेकरांच्या संपर्कात येत आहेत. श्री.नाईक यांचा कल हा स्वबळाकडे असून त्यांनी अनेकदा जाहीर कार्यक्रमात भाष्य देखिल करून श्री. शिंदे यांच्या विरोधात टीका देखिल केली होती.
ठाण्यात नौपाडा, उथळसर, घोडबंदर या भागात भाजपाची ताकद आहे त्यामुळे या भागातील भाजपाची ताकद आणखी वाढवून मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपाच्या प्रभागातील कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम श्री. नाईक हे करणार आहेत. नाईक हे भूमिपुत्र असल्याने येथिल आगरी-कोळी समाजात त्यांचा चाहता वर्ग आहे. त्यांच्याकडे प्रभारी पद दिल्यामुळे ठाकरे गटाचे माजी आमदार श्री. नाईक यांच्यासोबत येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. वागळे, लोकमान्यनगर, कोपरी, कळवा आणि दिवा या भागातील प्रभागांवर श्री.नाईक हे आपले लक्ष केंद्रित करणार असून या भागातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून पुन्हा ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण करण्याचा श्री.नाईक हे प्रयत्न करतील, अशी चर्चा सुरु झाली आहे.
श्री.नाईक यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यामुळे नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर या महापालिकांच्या निवडणुकीत फायदा होणार असल्याचे गणेश नाईक समर्थक दावा करत आहेत.
300x450
300x600