महाराष्ट्र
राज्यात पावसाचा जोर कमी; ठाणे पालघरमध्ये हलक्या सरी
राज्यात पावसाचा जोर कमी; ठाणे पालघरमध्ये हलक्या सरी
फोटो: ठाणे वैभव
मुंबई: पुढील काही दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान काही दिवस मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात गुरुवारी नैऋत्य मोसमी वारे एकाच जागी रेंगाळले होते. मोसमी वाऱ्यांची अरबी समुद्रात शाखा मंदावली आहे. बंगालच्या उपसागरात मोसमी पावसाने प्रगती केली. ईशान्य भारतातील संपूर्ण राज्ये व्यापली. छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागात मोसमी पावसाने प्रगती केली. तसेच उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग, हिमालयाकडील पश्चिम बंगालचा काही भाग, संपूर्ण सिक्किम मोसमी पावसाने व्यापला. मोसमी वाऱ्यांची सीमा गुरुवारी मुंबई, अहिल्यानगर, आलीदाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट या भागात होती. मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत पश्चिम बंगाल आणि विदर्भातील काही भागात मोसमी पाऊस वाटचाल करेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. या भागात हलक्या ते मध्यम सरी बरसतील. मात्र, मुसळधार पाऊस पडणार नाही. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागात शनिवार, रविवारीही पाऊस कोसळेल. याव्यतिरिक्त इतर भागात पावसाचा जोर कमी राहील. कोकणात रविवारनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर भागात मात्र पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावेळी मुसळधार पावसाची शक्यता फार कमी आहे. मुंबईत गुरुवारी संपूर्ण दिवसभर कोरडे वातावरण होते. यामुळे संपूर्ण दिवसभर उकाडा सहन करावा लागत आहे.
300x450
300x600