जिल्हा
१५ जुलैपासून नवी मुंबई विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय भरारी
१५ जुलैपासून नवी मुंबई विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय भरारी
फोटो: ठाणे वैभव
अबुधाबीसाठी नॉनस्टॉप सेवा सुरू; मुंबई विमानतळावरील ताण कमी होण्याची अपेक्षा
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाची प्रतीक्षा अखेर संपली असून, १५ जुलै रोजी एअर इंडिया एक्स्प्रेसचे पहिले नॉनस्टॉप विमान अबुधाबीसाठी झेपावणार आहे. या उड्डाणासाठी तिकिटविक्री सुरू झाली असून, या सेवेमुळे मुंबई विमानतळावरील प्रवाशांचा ताण कमी होण्याबरोबरच नवी मुंबई विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय सेवेला औपचारिक प्रारंभ होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ डिसेंबर रोजी देशांतर्गत विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय उड्डाणांनाही प्रारंभ होत आहे. एनएमआयएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. जे. के. शर्मा यांनी यापूर्वी १५ जुलैपासून आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर पहिल्या उड्डाणाच्या वेळापत्रकासह तिकिटविक्री सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
एअर इंडिया एक्स्प्रेसचे पहिले आंतरराष्ट्रीय विमान १५ जुलै रोजी पहाटे २.५५ वाजता नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करेल. प्रारंभी बुधवार, शुक्रवार आणि शनिवार या तीन दिवसांत ही सेवा उपलब्ध राहणार असून, प्रवाशांच्या प्रतिसादानुसार उड्डाणांची संख्या वाढविण्याचे नियोजन आहे.
अबुधाबी प्रवासासाठी जाण्या-येण्याचे तिकीट सध्या सुमारे ३२ हजार ५५० रुपयांपासून उपलब्ध आहे. अबुधाबीहून नवी मुंबईकडे येणारे पहिले विमान पहाटे ५.४५ वाजता सुटून सकाळी १०.२० वाजता नवी मुंबई विमानतळावर दाखल होईल.
पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक प्रवासी आणि विमानप्रेमींनी रविवारीच आरक्षण केले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील प्रवाशांकडून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, वाढत्या मागणीमुळे तिकीटदरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवा सुरू झाल्यामुळे मुंबई विमानतळावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच कार्गो सेवा उपलब्ध असल्याने पर्यटनासह मालवाहतूक क्षेत्रालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या या विमानतळावरून दररोज सुमारे १५० विमानांची ये-जा होत असून, जवळपास २० हजार प्रवाशांची नोंद होते. आंतरराष्ट्रीय सेवा सुरू झाल्यानंतर पुढील काही महिन्यांत ही संख्या तिपटीने वाढण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ॲप-आधारित टॅक्सी चालकांच्या संपामुळे विमानतळावरून परतणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले होते. अशा घटना टाळण्यासाठी नवी मुंबई आणि मुंबईतील प्रमुख भागांना जोडणारी वातानुकूलित बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
300x450
300x600