जिल्हा
अखेर स्टेडियमच्या आवारात उभे राहणार दोन अग्निशमन बंब!
अखेर स्टेडियमच्या आवारात उभे राहणार दोन अग्निशमन बंब!
फोटो: ठाणे वैभव
भाजप नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली होती मागणी
ठाणे: जवाहरबाग अग्निशमन दलाचे केंद्र बंद केल्यानंतर, दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या आवारात दोन अग्निशमन बंब उभारण्याची मागणी चार महिन्यांपासून सातत्याने करणाऱ्या भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांची मागणी अखेर महापालिका प्रशासनाने पूर्ण केली आहे. गावदेवी मंडईतील आगीच्या घटनेनंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या आवारात दोन अग्निशमन बंब तैनात करण्याचे आदेश दिले.
रेल्वे स्टेशन, बाजारपेठ आणि सरकारी कार्यालयांची गजबज असलेल्या स्टेशन रोड व नौपाडा परिसरात दररोज पाच ते सहा लाख नागरिकांची वर्दळ आहे. मात्र, ठाणे तहसीलदार कार्यालयाच्या पुनर्विकासात जवाहरबाग अग्निशमन केंद्र रुस्तमजी संकुलाजवळ हलविण्यात आले. तर एका इमारतीतील जागा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला देण्यात आली. त्यामुळे आगीच्या ठिकाणी पोचण्यासाठी अग्निशमन दलाला दिरंगाई होत असल्याकडे नम्रता कोळी यांनी वारंवार लक्ष वेधले होते.
जुन्या स्टेशन रोडवरील दाभोळकर चाळीमध्ये आग लागल्यानंतर अग्निशमन दल पोचण्यासाठी अर्ध्या तासाचा कालावधी लागला होता. त्यानंतर सॅटीस पुलावर शिवशाही बसला लागलेल्या आगीवेळीही अग्निशमन दल पोहोचेपर्यंत बस खाक होऊन गेली होती. दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. या समस्येकडे लक्ष वेधल्यावर नगरसेविका नम्रता कोळी यांना महापालिका प्रशासनाने पत्र पाठविले होते. या पत्रात स्टेडियममधील क्रिकेट सामन्यांमुळे पार्किंगसाठी जागा आवश्यक असल्याचे धक्कादायक कारण दिले होते.
अखेर गावदेवी मार्केटमध्ये आगीची घटना घडल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत नगरसेविका नम्रता कोळी यांनी पुन्हा हा मुद्दा मांडला. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी तातडीने स्टेडियमच्या आवारात दररोज दोन बंब उभे करण्याचे आदेश दिले.
300x450
300x600