जिल्हा
माथेरानपेक्षा बदलापूर थंड, ठाणे जिल्हा गारठला
माथेरानपेक्षा बदलापूर थंड, ठाणे जिल्हा गारठला
फोटो: ठाणे वैभव
बदलापूरः कोकणासह ठाणे जिल्हा थंडीने गारठला. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद मंगळवारी झाली. विशेष म्हणजे मुंबईजवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरान येथे १६.५ अंश सेल्सियस तापमान होते. तर बदलापूर शहरात १२.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी सांगितले आहे. जिल्ह्याचे सरासरी तापमान १४ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले होते. त्यामुळे सकाळच्या वेळी दाट धुके, गार वाऱ्यांचा अनुभव जाणवला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणावर घट पाहायला मिळाली आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये तापमानाने एकेरी आकडा गाठला आहे. ठाणे जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट नोंदवली गेली. तापमानाचा पारा घसरत असल्याने सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका जाणवतो आहे. पहाटेच्या सुमारास नोकरीनिमित्त, शाळेनिमित्त घराबाहेर पडणारे विद्यार्थी, नागरिकांना स्वेटर घालण्याची वेळ आली आहे.
गेल्या तीन दिवसांत तापमानात सातत्याने घट पाहायला मिळते आहे. मंगळवारी ठाणे जिल्ह्याचे तापमान सरासरी १४ अंश सेल्सियसवर होते. बदलापूर शहरात ठाणे जिल्ह्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. बदलापुरात मंगळवारी १२.४ अंश सेल्सिअस इतकी सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. तर कल्याण आणि पनवेल शहरात त्या खालोखाल १४.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. डोंबिवली शहरात १५ अंश सेल्सिअस, तर विरारमध्ये १५.४ अंश सेल्सिअस, तर ठाणे आणि नवी मुंबईमध्ये १५.९ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले.
माथेरान येथे १६.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. मात्र शेजारच्या कर्जत शहरात १२.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. माथेरानच्या तुलनेत रायगड मधीलच कर्जत शहराचे तापमान कमी होते. तर बदलापूर शहराचे तापमानही माथेरानच्या तुलनेत कमी होते. सकाळी वातावरणात थंडी तीव्र जाणवत होती. कार्यालयीन वेळेतही थंड वाऱ्याचा जोर कायम राहिल्याने रस्त्यांवर उबदार कपडे वापरणाऱ्यांची संख्या वाढली. ठाणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस किमान तापमानात असाच कल कायम राहण्याची शक्यता खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी व्यक्त केली आहे.
सध्या थंडीचा कडाका वाढलेला असला तरी ही थंडी आणखी दोन ते तीन दिवस जाणवण्याची शक्यता आहे. खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिलेल्या माहितीनुसार २१ नोव्हेंबरनंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. काही दिवस ही वाढ जाणवेल. त्यानंतर थेट डिसेंबर महिन्यात तापमानात घट दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
300x450
300x600