जिल्हा
शरद पवार गटाच्या नगरसेवकाची ठामपा आवारातच आंघोळ
शरद पवार गटाच्या नगरसेवकाची ठामपा आवारातच आंघोळ
फोटो: ठाणे वैभव
पाणीटंचाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
ठाणे: गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष असल्याने पाण्याचा पुरवठाच होत नाही. त्यामुळे आपल्या घरातही पाणी आले नाही, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अभिजीत पवार यांनी थेट ठामपा मुख्यालयाच्या आवारातच आंघोळ केली.
ठाणे महानगरपालिका हद्दीत पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. ठाणे शहराला 621 दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात 550 दशलक्ष लीटरच्या आसपास पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावत आहे. गेल्या काही दिवसांपासून दर आठवड्यात निर्जळी घेण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कळव्यात प्रचंड पाणीटंचाई भेडसावत आहे. बुधवारी अनेक सोसायट्यांमध्ये पाणीच आलेले नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. नागरिकांच्या या संतप्त भावनांना अभिजीत पवार यांनी अनोखे आंदोलन करून वाट मोकळी करून दिली.
अभिजीत पवार हे साधारण दीड वाजेच्या सुमारास पालिका मुख्यालयात आले. पालिका मुख्यालयाच्या आवारात असलेल्या नळावर बादली पाण्याने भरून पोर्चमध्येच आंघोळ केली.
याबाबत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी, पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष आहे. पाणी सोडण्यासाठी जी माणसे तैनात केली आहेत. ते पक्षपात करतात. अधिकाऱ्यांना फोन केल्यास ते उद्या बघू, असे सांगतात. आज आपल्या घरात पाणीच नसल्याने नाईलाजाने इथे येऊन आंघोळ करावी लागली. त्यामुळे जर पाणी संकट दूर केले नाही तर यापुढे अधिकाऱ्यांच्या घरात जाऊन आंघोळ करू, असा इशारा दिला. नगरसेवकाला पालिका मुख्यालयातील पाण्याने आंघोळ करावी लागत असेल तर तो काळा दिनच म्हणावा लागतील अशी प्रतिक्रिया शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली.
300x450
300x600