मुंबई: भारतीय सिनेसृष्टीवर तब्बल सहा दशके आपल्या स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ वर्सटाईल गायिका आशा भोसले यांनी वयाच्या ९२व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला
आशाताईंनी केवळ हिंदीतच नाही, तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन, ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली. ‘दम मारो दम’ आणि ‘ओम शांति ओम’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यांनी इंडस्ट्रीला दिली.
आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांसमोर येऊन आशाताईंच्या निधनाची बातमी साश्रू नयनांनी दिली. तसेच, आशाताईंवर उद्या सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर आशा भोसले यांची अंत्ययात्रा निघेल आणि सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
आशा भोसले यांना प्रकृती अस्वास्थामुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिनं सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या आजीच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. तिनं सांगितले की, “माझ्या आजीला चेस्ट इंफेक्शन आणि खूपच अशक्तपणा आलाय… त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय… कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर राखा, तिच्यावर उपचार सुरू आहेत… ती लवकरच बरी होईल…”
१९५०च्या दशकात आशाताईंनी कारकीर्दीची सुरुवात केली आणि हळूहळू आपल्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी स्वतःचं खास स्थान निर्माण केलं. ओ. पी. नय्यर, आर.डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली. त्यांनी क्लासिकलपासून कॅबरे, पॉप, गझल आणि रोमँटिक गाण्यांपर्यंत त्यांनी प्रत्येक प्रकारात आपली छाप पाडली. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’ यांसारखी त्यांची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्म विभूषणसारखे सन्मान मिळवले आहेत. त्यांच्या आवाजाची जादू आणि संगीत क्षेत्रातील योगदानामुळे त्या भारतीय संगीतविश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात.