ठाणे: चितळसर-मानपाडा परिसरातील इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोड, जमीन सपाटीकरण आणि रस्ते कामांबाबत आक्षेप घेत ‘वनशक्ती’ संस्थेने ठाणे महापालिका आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावत ही कामे थांबवण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांत या भागातील वृक्षतोड आणि पर्यावरणीय हानीबाबत वनशक्ती संस्थेने नोटीसा बजावल्या असून राष्ट्रीय उद्यानाच्या सीमांमध्ये आणि प्रवेशद्वारांच्या रचनेत बदल झाल्याचाही दावा नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२६ मध्ये दिलेल्या आदेशानंतर संबंधित भूभागाचा ताबा ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित झाला असला, तरी त्यामुळे पर्यावरणीय निर्बंध हटत नाहीत, असे ‘वनशक्ती’चे म्हणणे आहे. राष्ट्रीय उद्यान आणि इको-सेन्सिटिव्ह झोनच्या सीमांचे अंतिम निर्धारण होण्यापूर्वी कोणतेही विकासकाम हाती घेऊ नये, अशी भूमिका संस्थेने मांडली आहे.
वनशक्ती संस्थेच्या वतीने वकील रोनिता भट्टाचार्य यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये वन विभाग, इको-सेन्सिटिव्ह झोन नियंत्रण समिती आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अंतिम निर्णय होईपर्यंत परिसरात ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवावी, असेही नमूद करण्यात आले आहे.