कारवाईची व्यर्थ भीती; पाणीपट्टी वसुलीला गळती!

* ११ महिन्यांत फक्त ३६ टक्के वसुली
* उर्वरित ६४ टक्के वसुलीसाठी उरला फक्त एक महिना

ठाणे: ठाणे महापालिका प्रशासनाने थकबाकीदारांविरोधात जोरदार कारवाई हाती घेतली असली तरी आर्थिक वर्ष संपत आले असतानाही पाणीपट्टी वसुली ५० टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे वसुलीबाबत पाणी नक्की मुरते कुठे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी दिलेले २५० कोटींचे उद्दिष्ट गाठताना पालिका प्रशासनाचा घाम निघत असून आतापर्यंत तिजोरीत ८९ कोटी जमा झाले आहेत. पालिका निवडणुकांमुळे वसुली दोन महिने थांबल्याचे सांगण्यात येत असले तरी उरलेल्या नऊ महिन्यांत अवघी ३५.८३ टक्के वसुली करण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे उर्वरित ६४ टक्के पाणीपट्टी वसूल करण्यासाठी प्रशासनासमोर फक्त एक महिना उरला आहे.

मालमत्ता कर भरण्यात ठाणेकर आग्रही असताना पाणीपट्टी भरण्यासाठी कमालीची उदासिनता दिसून आली आहे. वास्तविक ठाणे पालिका स्वत:च्या योजनेसह मुंबई महापालिका, एमआयडीसीकडून पाणी घेते. प्रक्रिया करून हे पाणी ठाणेकरांच्या घरापर्यंत पोहचवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येतो. हा खर्च पाणीपट्टीच्या रुपाने भरून काढला जातो. पण आता खर्चही निघत नसल्याने पालिकेवरील बोजा वाढत चालला आहे.

एकूण २५० कोटी ८ लाख ८० हजार रुपयांच्या उद्दिष्टापैकी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पालिकेच्या तिजोरीत केवळ ८९ कोटी ६० लाख सात हजार रुपये जमा झाले आहेत. यंदा वसुलीत झालेली ही मोठी घसरण प्रशासनाच्या चिंतेत भर घालणारी आहे.

यंदा ठाणे महापालिका निवडणुकांमुळे कर्मचारी आणि यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त होती. या दोन महिन्यांच्या कालावधीत वसुलीची मोहीम थंडावली, ज्याचा थेट परिणाम एकूण वसुलीवर झाला असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

दिवा प्रभाग समितीमध्ये सर्वात कमी म्हणजे केवळ १७.४० टक्के वसुली झाली आहे. त्याखालोखाल वागळे २१.२१टक्के आणि मुंब्रा ३१.९१ टक्के या विभागांचा क्रमांक लागतो. दुसरीकडे, वर्तकनगर विभागाने ५१.४८ टक्के वसुली करून इतर विभागांच्या तुलनेत समाधानकारक कामगिरी केली आहे.

ठाणे महापालिकेने अभय योजना जानेवारीमध्ये लागू केली आहे. चालू वर्षाच्या मागणीसह थकबाकी भरल्यास दंड, व्याजात शंभर टक्के सुट देण्यात आली आहे. पण महिन्याभरानंतरही या योजेनेमुळे फारशी वाढ झालेली दिसत नाही. त्यामुळे पाणीपट्टी बुडवणार्‍यांविरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. नळसंयोजन खंडीत करणे, मिटर रुप सील करणे, पंप जप्ती अशी कारवाई रोज सुरू आहे.

प्रभाग समिती

उद्दिष्ट (कोटीत)

वसुली (कोटीत)

वसुली %

वर्तकनगर

२०.३९

१०.४९

५१.४८

लोकमान्य-सावरकर नगर

१५.४६

७.३४

४७.५०

माजीवडा-मानपाडा

४०.४७

१९.१३

४७.२९

नौपाडा-कोपरी

३५.०७

१४.२७

४०.७१

कळवा

२४.८७

९.४८

३८.१४

दिवा

४६.२४

८.०४

१७.४०