कनिष्ठ अभियंत्यांवर होणार कारवाई
भाईंदर: मीरा-भाईंदर शहरातील बहुचर्चित पाणी शुद्धीकरणासाठी मुदतबाह्य सोडियम हायपोक्लोराइट रसायनाचा वापर झाल्याच्या आरोपाप्रकरणी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आलेला खुलासा समाधानकारक नसल्याने यावर संबंधित कनिष्ठ अभियंत्यावर कारवाईचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी महासभेत दिली.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या २८ स्वयंचलित क्लोरीन केंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीबरोबरच सोडियम हायपोक्लोराइटच्या पुरवठ्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांच्या निविदेला अंतिम मंजुरी देण्याचा प्रस्ताव ३१ जुलै रोजी स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे गटनेते जय ठाकूर यांनी पाणी शुद्धीकरणासाठी वापरले जाणारे सोडियम हायपोक्लोराइट रसायन २०२४ मध्येच मुदतबाह्य झाल्याचा आरोप केला होता. हेच रसायन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी वापरले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
मुदतबाह्य रसायनामुळे पाणी निर्जंतुक करण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता असून, त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे ठाकूर यांनी सांगितले. या आरोपाची गंभीर दखल घेत स्थायी समितीचे सभापती हसमुख गहलोत यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच संबंधित निविदा रद्द करणे, कंत्राटदाराचा करार रद्द करणे आणि दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे सांगण्यात आले.