मामा-भांजे: कारवाईचा चेंडू वन खाते आणि ठामपाच्या कोर्टात

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरमधील मामा-भांजे डोंगरावरील अनधिकृत बांधकामांमुळे भारतीय वायुसेनेच्या तळाला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी याबाबत वन विभाग आणि ठाणे महापालिकेकडे यासंदर्भात पत्र दिल्याची माहिती मनसेचे संदीप पाचंगे यांनी दिली आहे.

मामा भांजे येथील अतिक्रमणापेक्षा देशाची सुरक्षा महत्वाची असल्याने प्रशासनाने हे अतिक्रमण तत्काळ हटवावे, अन्यथा, दर्ग्याशेजारीच शंकराचे मंदिर उभारण्याचा इशारा मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक व वनसंरक्षक यांना लेखी निवेदनाद्वारे दिला होता. याची दखल घेत दोन्ही दर्ग्या आजूबाजूला असलेले अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत शासकीय पातळीवर कार्यवाही करण्यात येणार असल्याची पोलिसांनी पत्राद्वारे हमी दिली आहे.

पर्यटक, गिर्यारोहक, पर्यावरण प्रेमी यांची वर्दळ असलेल्या येऊरमधील या मामा-भांजे दर्ग्याशेजारी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने हाकेच्या अंतरावर असलेल्या कान्हेरी हिल येथील भारतीय वायुसेनेच्या तळाला धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत, भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना पत्रव्यवहार करून येथील बेकायदा बांधकामे त्वरीत हटविण्याची मागणी केली होती . मात्र, ढिम्म प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. या ठिकाणी दर्ग्याशेजारी मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी स्थानिकांनी मनविसेकडे केल्या होत्या.

येऊरमधील मामा भांजे डोंगरावर गेले बरेच वर्षांपासून दोन दर्गे आहेत. त्यापैकी एक दर्गा हा वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून दुसरा दर्गा श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत आहे. या दोन्ही दर्ग्याचे आजूबाजूला असलेले अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत शासकीय स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच हे अतिक्रमण वन विभागाच्या जागेवर असल्याने अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी वन विभाग आणि ठाणे महानगरपालिकेची असून संबंधीत विभागाला पोलिसांनी लेखी पत्राद्वारे कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करूनही वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने येथील बेकायदा बांधकामे त्वरीत हटविण्यासंदर्भात कोणतीच पावलं उचलली नव्हती. अखेर हा विषय मनसेच्या हाती आल्यानंतर अतिक्रमण हटविण्यासंदर्भात प्रशासनाला मागणी केली. त्यानंतर दोन दिवसातच अखेर प्रशासनाला जाग आली असून याची दखल घेत कारवाई होण्याची हमी पोलिसांनी पत्राद्वारे दिली आहे तसेच या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य न करण्याचे आवाहन केले आहे.

मनसेची माहिती चुकीची; जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

मामा भांजे दर्गा ट्रस्टचा खुलासा

मामा भांजे येथील अतिक्रमणामुळे वायू सेनेच्या तळाला धोका निर्माण झाल्याचे वृत मनसेने दिलेल्या माहितीनुसार देण्यात आले. ही माहिती खोटी असून मनसे जातीय तेढ निर्माण करत असल्याचा खुलासा सचिव नुर मोहम्मद मुजावर यांनी केला आहे.

ट्रस्टची स्थापना १९५४ची असून धर्मादाय आयुक्त, वन विभाग यांच्याकडे नकाशानुसार नोंदी आहेत तर राज्य शासनाने या स्थळास तीर्थ क्षेत्राचा दर्जा दिला असल्याची माहिती सचिव श्री.मुजावर यांनी दिली आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांनी या धार्मिक स्थळ नेहमीच सहकार्य केले तर मुख्यमंत्र्यांचेही सहकार्य असते. येथील दरवर्षी होणाऱ्या जत्रेला हिंदू मुस्लिम-बांधवांची मोठी उपस्थिती असते. असे असताना मनसे जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप श्री.मुजावर यांनी केला आहे.