१५ अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल
भाईंदर: वसई तालुक्यात अनधिकृत शाळांचे पिकच आहे. यावर्षी वसईत एकूण १५ हून शाळांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
वसई-विरारमधील अनधिकृत शाळांच्या याद्या दरवर्षी जाहीर केल्या जातात. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. मात्र या अनधिकृत शाळा निष्कासित करण्याचे स्वारस्य मात्र स्थानिक प्रशासनांकडून दाखवले जात नाही. त्यामुळे नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, अनधिकृत शाळांच्या याद्या जिल्हा तसेच तालुका स्तरावरील शिक्षण विभागाकडून जाहीर केल्यानंतर नागरिकांनी अशा अनधिकृत शाळांत पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये असे आवाहन अनेकदा करण्यात येते. मात्र शाळा संचालकांच्या विविध आमिषांना पालक बळी पडतात. वरवरच्या दिखाव्याला भुलून पालकवर्ग विद्याथ्यांचे भवितव्य धोक्यात घालत आहेत.
उच्च न्यायालयाने वसई-विरार महापालिकेला अनधिकृत शाळांसमोर ‘अनधिकृत शाळा’ असे फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेने यातील काही शाळांसमोर दर्शनिय भागात ‘अनधिकृत शाळा’ असे फलक लावले होते. मात्र शाळा संचालकांकडून ते काढून फेकून देण्यात आले आहेत. शिक्षण विभाग व पालिका प्रशासनाने अशा अनधिकृत शाळांविरोधात केवळ दिखावा म्हणून नव्हे तर ठोस कारवाई करायला हवी, असे आवाहन सूज्ञ पालकांनी केली आहे.