दिवा-शीळ नागरिक हक्क समितीची तत्काळ कारवाईची मागणी
ठाणे: दिवा परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी दिवा-शीळ नागरिक हक्क समितीच्या वतीने आज ठाणे महापौर, उपमहापौर, अतिरिक्त आयुक्त, गटनेते यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, दिवा प्रभाग समिती हद्दीत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेने अशा बांधकामांवर कठोर कारवाई करणे बंधनकारक असतानाही काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून शहराच्या नियोजनावरही परिणाम होत आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ तपासणी करून अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी समितीचे सदस्य हिरा पाटील, ऍड. रोहिदास मुंडे, सचिन पाटील, प्रकाश पाटील तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
समितीच्या वतीने प्रशासनाने या गंभीर विषयाची तत्काळ दखल घेऊन दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
कळवा-विटाव्यातही बांधकामे जोरात
कळवा खाडीलगत मातीचा भराव टाकून पुन्हा एकदा बांधकामांचा जोर वाढला आहे. त्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. खारीगाव हद्दीत नाशिक मार्गावर साकेत पुलाजवळ मोठ्या प्रमाणात खारफुटी उद्ध्वस्त करून बंगल्यांचे बांधकाम झाले आहे. विटाव्यात देखिल जुन्या बांधकामावर लोड बेरिंग पद्धतीने नवीन बांधकामे मोठ्या प्रमाणात होत असून संभावित दुर्घटना टाळण्यासाठी या बांधकामांवर तत्काळ कारवाईची मोहीम हाती घेण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.