ठाणे: नालासोपार्यातील वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असताना वसईतही दोन वाहतूक पोलिसांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने एकाच खळबळ उडाली आहे.
वसईच्या वालीव पोलीस ठाण्यातील हवालदार विठ्ठल नांगरे आणि मनोज केंद्रे या वाहतूक पोलिसांवर आरोपी रिक्षा चालकाने भर स्त्यात हल्ला केला. येथील रेंज नाका परिसरात नाकाबंदी दरम्यान आरोपीने त्याची रिक्षा न थांबवता, आणि पोलिसांनी त्याच्याकडे नाव, पत्ता, कुठून आला या बाबत माहिती विचारली असता, कोणतीही माहिती न देता “आम्ही गाववाले आहोत, आम्हाला अडवणारे तुम्ही कोण..? पोलिसांना खूप माज आलाय” असं म्हणत शिवीगाळ करत पोलीस हवालदार विठ्ठल नांगरे यांच्या अंगावर पेटती सिगारेट फेकली आणि वर्दीवर असलेल्या नांगरे यांची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावल्याचा आरोप विठ्ठल नांगरे यांनी केला आहे.
यावेळी आरोपीला थांबवण्यास गेलेल्या हवालदार मनोज केंद्रे यांच्याही कानशिलात लगावून त्यांच्या हाताचा अंगठा पिरगाळून दुखापत केली, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांनाच आता संरक्षणाची गरज असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
१५ जुलै रोजी नालासोपाराच्या तुळींज पोलीस ठाण्याअंतर्गत प्रगती नगर परिसरात दोन वाहतूक पोलिसांना बापलेक आणि त्यांच्या साथीदाराने मिळून लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे.
त्यानंतर, काल 16 जुलै रोजी त्याच तुळींज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन गटात पोलिसांसमोरच फ्रीस्टाइल हाणामारी झाली होती. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर आज 17 जुलै रोजी समोर आलेली वसईतील दोन पोलिसांना रिक्षा चालकाकडून झालेल्या मारहाणीची घटना ही 15 जुलै रोजीची आहे.