ठाणे : विकास कामांमुळे आणि वाहतुकीमुळे पसरलेल्या धुळीमुळे ठाणेकर कमालीचे त्रासले आहेत. यावर उपाय म्हणून ‘मिस्ट फाऊंटन’ 80 अंशात फिरणारी पाणी फवारणी करणारी यंत्रणा सोमवारी सुरु करण्यात आली.
ठाणे शहरांतील ठिकठिकाणी इमारतींच्या विकासकांचे 24 तास सुरु असलेले प्रकल्प, त्यांचे रेडी मिक्स प्लांट काँक्रीट ऑपरेटर, महापालिकेच्या हद्दीतील ठिकठिकाणी रस्त्यांची लहान-मोठी कामे करणारे कंत्राटदार, त्यातच मेट्रो रेल्वे प्रकल्पांचीही उभारणी, ठाणे शहराच्या चहुबाजूंनी जाणारी विविध प्रकारची लहान-मोठ्ठी वाहने, रुग्णवाहिका शिवाय मालवाहू वाहनांचीही 24 तास ये-जा आदी कारणांमुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाले आहे.
धुळीच्या त्रासातून ठाणेकरांना काही अंशी दिलासा मिळावा यासाठी महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाने ‘मिस्ट फाऊंटन’/ 80 अंशात फिरणारी पाणी स्प्रिंकल करणारी यंत्रणा सोमवारी सुरु केली. तसेच फिरती प्रयोगशाळा (मोबाईल व्हॅन) माध्यमातूनही धुळीचे प्रमाण तपासले जाणार आहे. त्यानंतर आठ दिवसांनी हवेची गुणवत्ता किती असणार याचा तौलनिक अभ्यास करण्यात येईल.
धुलीकणांपासून ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळण्याकरीता नियंत्रण कक्षाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्याचे पालन लोकांनी मनापासून केले पाहिजे आणि धूळमुक्त वातावरण सुनिश्चित करण्यासाठी आपण सर्वांनी त्यावर एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे धुळीचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असे ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान म्हणाल्या.
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काही कृती बिंदू दिले आहेत. वाहतूक कोंडीचा धोका असलेल्या माजिवाडा, चौक, विटावा, भागात कणांचे प्रदूषण रोखण्यासाठी पाण्याचे फवारे (स्प्रिंकल्स) फवारणी सुरु केली आहे. वाहनांच्या गर्दीच्या ठिकाणी 15 ते 16 फुट उंचीवरुन पाण्याची अत्यंत कमी वेगाची फवारणी करण्यात येईल. ही यंत्रणा सकाळी आणि सायंकाळी वापरली जाणार आहे.