* नवीन बसगाड्या-गारेगार प्रवास
* तिकीटदर होणार कमी
* ४८७.६९ कोटींचा अर्थसंकल्प
ठाणे : ठाणेकरांच्या सेवेत टप्याटप्याने नवीन इलेक्ट्रीक बस प्रवासासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार या बसचे तिकीट देखील कल्याण, नवी मुंबईच्या धर्तीवर ठेवायचे की कसे यावर देखील विचार विनिमय झाला असून तिकीट दर कमी होणार असून ठाणेकर प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार आहे. शुक्रवारी ठाणे परिवहनचा २०२३-२४ चा ४८७.६८ कोटी रकमेचा मूळ अर्थसंकल्प सादर झाला.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने मागील वर्षी २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता ६२० कोटी ९० लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात परिवहन प्रशासनाने महापालिकेकडे तब्बल ४६० कोटी ५४ लाखांच्या अनुदानाची मागणी केली होती. यंदा अनुदानापोटी ३२० कोटी ६ लाख रकमेची मागणी केली आहे. करोना काळात परिवहन उपकमाची बससेवा ठप्प असल्यामुळे या उपक्रमाच्या उत्पन्न वसुलीवर मोठा परिणाम झाला होता. त्यातूनच इतक्या मोठ्या अनुदानाची मागणी करण्यात आली होती. केंद्र शासनाकडून स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत मिळालेल्या निधीतून ८० वीजेवरील बसखरेदी करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी ११ बसगाड्या परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झाल्या आहेत.
यंदाच्या अर्थसंकल्पातही अशाच प्रकारची घोषणा करण्यात आली आहे. वीजेवरील ३०३ बसगाड्या खरेदी करण्यात येणार असून या बस केंद्र शासनाकडून स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत मिळणाऱ्या निधीतून २०२६ सालापर्यंत टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यात येणार आहेत. याशिवाय, परिवहन उपक्रमाच्या निधीतूनही अशा बस खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे परिवहनच्या ताफ्यातील बसची संख्या वाढविण्यावर यंदाच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. याशिवाय, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांच्या धर्तीवर ठाणे परिवहन उपक्रमातील वीजेवरील बसगाड्यांचे तिकीट दर निश्चित करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. तिकीट दर हे निम्यावर येणार आहेत त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास गारेगार होणार आहे.
अर्थसंकल्पातील वैशिष्ट्ये
* बसफेऱ्या वाढविण्यावर भर
* प्रवासी संख्या वाढविण्यावर भर
* नवीन मार्ग प्रस्तावित
* नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आदी मार्गावर देखील बस धावणार
* नवीन १२३ बस दाखल होणार
* पर्यावरणपूरक बस घेणार