आरोपी २४ तासांत जेरबंद
उल्हासनगर: अंबरनाथ तालुक्यातील नाऱ्हेन गाव येथे महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून सोन्याची गंठन हिसकावण्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात हिललाईन पोलीस ठाणे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या २४ तासांच्या आत मुख्य आरोपीला अटक केली असून आणखी एका साथीदाराचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी रोजी विठा पाटील या काही कामानिमित्त जुन्या पाण्याच्या टाकीजवळून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तरुणाने त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली व गळ्यातील सुमारे सहा तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने प्रतिकार केल्यामुळे आरोपीला अंदाजे तीन तोळे सोने घेऊन पसार व्हावे लागले.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच पोलिस पाटलांच्या मदतीने तपास सुरू केला. या कारवाईत मुख्य आरोपी आकाश पाटील याला अटक करण्यात यश आले. उर्वरित एका आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संग्राम मालकर करत आहेत. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.