२ ऑगस्टला कोणतेही ग्रहण नाही

ठाणे: २ ऑगस्टला खग्रास सूर्यग्रहण होणार असल्याने संपूर्ण जग सहा मिनिटे अंधारात बुडणार असल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

यावर्षी २ ऑगस्टला कोणतेही ग्रहण होणार नाही. पृथ्वीवर सहा मिनिटे अंधार होणार नाही. ती बातमी खोटी आहे. मात्र दोन वर्षांनी २ ऑगस्ट २०२७ रोजी सहा मिनिटे खग्रास स्थिती असणारे खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. त्यावेळी सुद्धा संपूर्ण पृथ्वीवर अंधार होणार नाही. भारतातून ते सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे.

यावर्षी होणा-या चंद्र-सूर्य ग्रहणांविषयी माहिती दा.कृ.सोमण यांनी दिली. या वर्षी रविवार ७ सप्टेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार असून ते भारतातून रात्री ९-५७ ते उत्तररात्री १-२७ या वेळेत दिसणार आहे. त्यानंतर रविवार २१ सप्टेंबर रोजी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, असेही श्री. सोमण यांनी सांगितले.