राज्यात थंडीचा कडाका वाढणार

 ‘शीत लाटे’ची शक्यता, हवामान विभागाचा ॲलर्ट
मुंबई: मुंबईचा अपवाद वगळता बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने थंडीची जाणीव आणखी तीव्र झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा गार हवामानाचा अनुभव येत असून, येत्या काही दिवसांत ही थंडी अधिक वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
मुंबई शहर व उपनगरात सकाळच्या सुमारास हलके धुके पसरलेले दिसू शकते. सकाळची वेळ गारठ्याची जाणवेल, तर उशिरा सकाळपासून आकाश क्रमाक्रमाने स्वच्छ होत जाईल. शहरातील कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही जवळपास असेच हवामान राहील. सकाळी गारठा आणि दुपारी तुलनेने उबदार वातावरण अनुभवायला मिळेल.
दरम्यान, राज्यातील तापमान सातत्याने घसरत असल्याने हवामान विभागाने नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सकाळ-संध्याकाळ बाहेर पडताना गरम कपड्यांचा वापर करावा, तसेच थंडीशी संबंधित आजारांपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे सूचित करण्यात आले आहे.