‘जनसेवकाचा जनसंवाद’ उपक्रमाची व्याप्ती वाढली

ठाण्यासह इतर शहरातील नागरिकही समस्या मांडू लागले

ठाणे : ठाण्याचे आमदार संजय केळकर यांचा ‘जनसेवकाचा जनसंवाद’ हा उपक्रम ठाण्यापुरता मर्यादित न राहता मुलुंड, घाटकोपर, दादर, बदलापूर, दिवा, डोंबिवली, कल्याण, पनवेल, खोपोलीपर्यंत त्याची व्याप्ती वाढली आहे. या उपक्रमात नागरिकांच्या समस्यांचे निरसन होत असल्याने दर सोमवारी आणि शुक्रवारी मोठ्या संख्येने नागरिक आपल्या समस्या, अडचणी, गाऱ्हाणी घेऊन आ. संजय केळकर यांना भेटण्यासाठी येत आहेत.

आजच्या झालेल्या या उपक्रमातही शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी आ. केळकर यांच्या समोर मांडल्या. परांजपे स्किममध्ये फसवणूक झालेल्या सदस्यांनी आ. केळकर यांची भेट घेतली तसेच आधारकार्ड, शाळेतील प्रवेश, फी कमी करणे, शिधापत्रिका संबंधित कामे, करार नोंदणी, बढती, ठामपा कर्मचाऱ्यांचे विषय, महापालिकेच्या कळवा हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेणेबाबत, धर्मवीर नगर फेज 2 येथे रस्त्यावरील पथदिवे, विकासकांनी केलेली फसवणूक, बाळकूम येथील अवजड वाहन पार्किंग, महानगर गॅस जोडणी, दिवा येथे अंगणवाडी संख्या व महिला पोलिसांची संख्या वाढवणे असे अनेक विषय आ. केळकर यांच्यासमोर मांडण्यात आले. त्यातील काही विषय आ. केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून जागीच सोडविले.

‘जनसेवकाचा जनसंवाद’ हा उपक्रम नागरिकांच्या हक्काचा आहे. या उपक्रमात आलेल्या नागरिकांचे समाधान हाच माझ्यासाठी आनंदाचा क्षण असतो. त्यांच्या आलेल्या तक्रारी निवेदनावर आमच्याकडून पाठपुरावा होऊन त्या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. माझ्याकडे येणाऱ्या तक्रारीमध्ये विकासकांनी फसवणूक केलेल्या तक्रारी अनेक आहेत व अजूनही येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून वेळीच जर त्या-त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिले तर नागरिकांची फसवणूक होणार नाही. या फसवणूक झालेल्या नागरिकांशी, कुटुंबाच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. त्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे आ. केळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी खोपट कार्यालयात माजी उपमहापौर सुभाष काळे, माजी नगरसेवक मनोहर डुंबरे, रमेश आंब्रे, महेश कदम, ओमकार चव्हाण, मेघनाथ घरत आदी उपस्थित होते.