‘मुंह में मोदी का नाम, पर थाना में भाजपा बेनाम’
‘स्वाभिमानी कार्यकर्त्यांची सहनशक्ती संपली’
ठाणे : एकीकडे ठाणे लोकसभेवरून शिवसेना आणि भाजपमधून विस्तव जात नसताना आता शिवसेना शिंदे गटाकडून ठाण्यात भाजपला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. ‘मुँह मे मोदीजी का नाम…और थाना मे बीजेपी बेनाम’, अशी उद्विग्न प्रतिक्रियाही केळकर यांनी दिली आहे. महिलांना परिवहन सेवेत ५० टक्के सवलत देण्याची आमची असताना आम्हालाच या कार्यक्रमातून डावलले असल्याचे आरोपही त्यांनी केला आहे.
ठाणे पालिकेच्या २०२४ – २५ च्या अर्थसंकल्पात परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून ६० वर्षावरील नागरिकांना विनामूल्य प्रवास, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत व बसमधील डाव्या बाजूची आसने महिलांसाठी राखीव ठेवण्याच्या लोकाभिमुख घोषणा करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबाबत घोषणा केली होती. या योजनेचा शुभारंभ बुधवार, १३ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सॅटिस पूल येथे सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला. या ठिकाणी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख, माजी महापौर नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक विकास रेपाळे व शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. या ठिकाणी भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित नसल्याबाबत आमदार संजय केळकर यांना विचारले असता त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपाला हे नवीन नाही, अखंड शिवसेनेसोबत २५ ते ३० वर्षे आम्ही एकत्र होतो, आत्ता विभक्त झालेल्या शिवसेनेसोबत आहोत, मात्र अशा पद्धतीच्या वागणुकीची भाजपला सवय झाल्याचे केळकर म्हणाले.
एकतर्फी निर्णय, एकतर्फी धोरण, एकतर्फी कोणाला कार्यक्रमांना बोलवायचे नाही, असे ठाण्यात वारंवार घडते, मी याबाबत बोलणार नव्हतो. मात्र सहनशक्तीला काही मर्यादा असते, अशा शब्दात केळकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या एकछत्री कार्यपद्धतीवर परखड टीका केली. भाजपाचा कार्यकर्ता स्वाभिमानी असून त्याला वेळोवेळी डावलले जात आहे, ‘मुँह मे मोदीजी का नाम…और थाना मे बीजेपी बेनाम’ अशा शब्दात केळकर यांनी शिवसेना शिंदे गटाला लक्ष्य केले. भाजपचे कुठे नावही नको अशी सध्या स्थिती असून भाजपला हे पटणारे नाही असे केळकर म्हणाले.
शिवसेना शिंदे गटाकडून ठाण्यात भाजपाला नेहमीच डावलले जात असून भाजपा कार्यकर्ते आता उघड उघड नाराजी व्यक्त करू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे योग्य नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करणार आहोत. कार्यकर्त्यांची भावना मी व्यक्त केली असून शिंदे गटाच्या नेत्यांनी संबंधितांना समज द्यावी, अशी सूचना श्री.केळकर यांनी केली आहे.