घणसोलीमधील ‘त्या’ नऊ इमारतींचा वीजपुरवठा खंडित होणार

नवी मुंबई: घणसोलीमधील नऊ अनधिकृत इमारतींच्याबाबत न्यायालयात याचिका दाखल असून या इमारतींचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार आता विद्युत विभागाने देखील हालचाली सुरू केल्या असून त्यांच्या या इमारतींचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत नोटीस बजावली असल्याचे ऐरोली विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी कळवले आहे.

नवी मुंबईतील घणसोली अर्जुनवाडी परिसरातील चार मजली बेकायदा अनधिकृत इमारती उभारल्या गेल्या आहेत. या संदर्भातील एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी करताना वाढत्या अवैध बांधकामांच्या समस्येबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त करत आदेश दिले होते. या आदेशानुसार वीज मिटर निष्कासित करणे व वीज पुरवठा कायम स्वरूपी खंडित करण्याचे एमएसईबी विभाग ऐरोलीचे अति. कार्यकारी अभियंता व घणसोलीचे सहाय्यक अभियंता यांनी सर्व इमारतींना नोटीस देऊन, सात दिवसांमध्ये कारवाई करण्याचे अखेर ठरवले आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात या इमारतीमधील रहिवाशांवर अंधारात राहण्याची वेळ येणार आहे.